पाणीपुरवठा योजनेचे दस्तऐवज गहाळ
By Admin | Updated: May 24, 2014 00:08 IST2014-05-23T23:33:47+5:302014-05-24T00:08:25+5:30
लोणार तालुक्यातील सोनाळा येथील पाणीपुरवठा योजनेचे दस्ताऐवज २00७ पासून गहाळ!

पाणीपुरवठा योजनेचे दस्तऐवज गहाळ
लोणार : तालुक्यातील सोनाळा येथील भारत निर्माण अंतर्गत राबविण्यात येणार्या पाणीपुरवठा योजनेचे दस्ताऐवज २00७ पासून गहाळ झाले आहेत. त्यामुळे कामे पूर्ण न करताच येथे बिले काढण्यात येत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. ग्रामीण भागातील जनतेला नियमीत शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे याकरीता भारत निर्माणच्या माध्यमातून शासनाने ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत कोट्यावधी रुपयाचा निधी ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध करुन दिला. मात्र ग्राम पातळीवर पाणीपुरवठा योजनेची कामे न करताच संबंधित अधिकार्यांनी ह्या योजना भ्रष्टाचाराच्या चिखलात लोटल्या सोनुना याठिकाणी २00७ पासून भारत निर्माण अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली होती. योजनेचे अर्धवट काम करुन ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे शाखा अभियंता डि.के.पागोरे यांनी गावातील समिती, ग्रामपंचायत सचिव, तलाठी यांना हाताशी धरुन योजनेचे काम न करता पूर्ण बिल काढून घेतले. योजनेचे काम पूर्ण न झाल्याने गावकर्यांना नियमीत पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे गावकर्यांनी वारंवार तक्रार करुनही त्याची दखल घेतल्या गेली नाही. श्रीराम गोविंद हाके यांनी सदर योजनेच्या दस्ताऐवजाची मागणी माहिती अधिकाराखाली ग्रामपंचायत, पंचायत समिती, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागीय कार्यालयाकडे केली. मात्र सर्वांनी मिळून केलेल्या अफरातफरीमुळे या अधिकार्यांनी योजनेचे संपूर्ण दस्ताऐवजच गहाळ करुन टाकल्याचे समजते. गावातील भारत निर्माण योजनेच्या चौकशीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी समिती स्थापन केली होती. मात्र या समिती सदस्यांनाही कार्यकारी अभियंता पागोरे यांनी लोणारवरुनच परत पाठवून दिल्याचा आरोपही हाके यांनी केला. तसेच योजनेचे खोटे दस्ताऐवज तयार करुन ते मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेसमोर सादर करुन त्यांचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत झालेल्या सर्व कामांची सखोल चौकशी केल्यास मोठे घबाड उघडे पडणार आहे. त्यामुळे या संपूर्ण कामाची चौकशी करुन दोषीविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी हाके यांनी केली आहे.