दहा दिवसाआड पाणीपुरवठा!
By Admin | Updated: September 4, 2015 23:52 IST2015-09-04T23:52:58+5:302015-09-04T23:52:58+5:30
फटका वीज भारनियमनाचा ; खामगाव शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत.

दहा दिवसाआड पाणीपुरवठा!
खामगाव : गेल्या दहा-बारा दिवसांपासून भारनियमनामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी शहरातील नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. २७ ऑगस्टपासून शुक्रवारपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने पालिकेचे नियोजन कोलमडले असून, पूर्वी सात दिवसाआड होणारा पाणीपुरवठा आता चक्क दहा दिवसांवर येऊन ठेपला आहे. शहरातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाच्यावतीने शहराची पाच झोनमध्ये विभागणी केली आहे. या विभागणीनुसार शहरातील विविध वस्ती आणि कॉलन्यांना सात दिवसांआड पाणीपुरवठा केला जातो; मात्र भारनियमनामुळे गेल्या काही दिवसांपासून पालिका प्रशासनाचे नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे शहरातील काही भागांना तहानलेलेच रहावे लागत आहे. नियोजित वेळेनुसार आणि अपेक्षेप्रमाणे पाणी मिळत नसल्यामुळे शहरातील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. शहरातील समतल तसेच टेकडीच्या परिसरातही पाणीपुरवठा होत नसल्यामुळे ऐन पावसाळ्यात नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरू झाल्याचे चित्र शहरातील सर्वच वस्त्यांमध्ये दिसून येत आहे. पाणीपुरवठय़ासाठी पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी तसेच अधिकार्यांकडे नागरिकांचा तक्रारींचा ओघ वाढला आहे; मात्र भारनियमनामुळे पालिका प्रशासनाला पाणीपुरवठा सुरळीत करण्यात सातत्याने अपयश येत असल्यामुळे नागरिकांचा रोष दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र पालिकेत दिसून येत आहे. याबाबत नगरपरिषदेकडून वीज वितरण कंपनी कार्यालयाकडे वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत पाठपुरावा होत आहे.