सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा

By Admin | Updated: July 10, 2014 23:33 IST2014-07-10T23:02:49+5:302014-07-10T23:33:40+5:30

१0 जुलैपर्यंत अवघा ३९ टक्के पाऊस झाला असून, गेल्या महिनाभरापासून पेरण्या खोळंबून आहेत.

Waiting for universal rain | सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा

सार्वत्रिक पावसाची प्रतीक्षा

बुलडाणा : मृग नक्षत्राचा प्रारंभ ७ जून रोजी होतो. त्यामुळे पावसाळा अधिकृत सुरू झाला असे आपण म्हणतो. यावेळी मात्र पावसाचा अद्यापही पत्ता नाही. आज १0 जुलैपर्यंत अवघा ३९ टक्के पाऊस झाला असून, गेल्या महिनाभरापासून पेरण्या खोळंबून आहेत. आतापर्यंत ३ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. त्याही उलटण्याच्या स्थितीत असून, संपूर्ण जिल्हा दुष्काळाच्या उंबरठय़ावर येऊन ठेपला आहे. दररोज आभाळ दाटून येते; पण पाऊस येत नसल्याने निराशेचेच ढग दाटून आले आहेत.
गेल्यावर्षी १0 जुलैपर्यंत ३५0 मि.मी. पावसाची नोंद झाली होती. यावेळी ३९ टक्केपर्यंत पाऊस पडला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यात १ ते २ वेळा पावसाने तुरळक हजेरी लावली; मात्र मोताळा तालुक्यात आतापर्यंत पावसाचा थेंबही पडला नाही. अवर्षणप्रणव म्हणून घोषित असलेल्या मोताळा तालुक्याची स्थिती सर्वाधिक बिकट अशी आहे. सिंदखेडराजा, शेगाव, खामगाव या परिसरात झालेल्या धूळपेरण्या उलटण्याच्या मार्गावर असून, मान्सूनपूर्व लावलेली कपाशी फक्त ठिबकच्या भरोशावर तग धरून आहे. जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठाही खालवत चालला असून, तीन मोठय़ा प्रकल्पातील जलसाठा ४0 टक्क्यापर्यंत, तर ७ मध्यम प्रकल्पातील जलसाठा २७ टक्क्यापर्यंत उतरला आहे. आता पिण्याच्या पाण्याचेही संकट घोंगावत आहे.

** येत्या चार दिवसात जिल्ह्यात पावसाची शक्यता

जळगाव जामोद : हवामानाच्या अंदाजानुसार येत्या ३/४ दिवसात जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी घाई न करता १८ जुलैपर्यंत पेरणीचे नियोजन करावे, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांनी लोकमतशी बोलताना दिली आहे. पाऊस लांबल्याने शेतकर्‍यांचे पेरणीचे नियोजन पार कोलमडले असून, जवळपास पावसाळा सुरू होऊन दीड महिना लोटल्याने खरीप हंगामाचे कसे होणार, या धास्तीने शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र दिसत आहे. प्रचंड कोरड्या दुष्काळाची चिन्हे दिसत असताना भारतीय हवामान खाते पुणे यांच्या अंदाजानुसार कृषी विज्ञान केंद्राचे प्रा. अनिल गाभणे, प्रा. संजय उमाळे यांनी ११ ते १६ जुलै या आठवड्यात पावसाची शक्यता वर्तविल्याने त्याचा शेतकर्‍यांना फार मोठा दिलासा मिळणार आहे; परंतु उशिरा का होईना खरीप हंगामाशिवाय कोरडवाहू शेतकरी कशाच्या भरवशावर आपली उपजीविका करणार, हा मोठा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत तीच-ती पिके पेरल्यास नुकसानही संभवू शकते म्हणून आता शेतकर्‍यांनी उडीद, मूग, ज्वारी आणि बी.टी. कपाशी बियाण्यांची पेरणी करू नये कारण खोडकिडींचा प्रादुर्भाव, उत्पादनात घट होते. त्याऐवजी शेतकर्‍यांनी लवकर येणार्‍या देशी व सरळ वाणाचा वापर पेरणीसाठी करावा. शिफारशीपेक्षा २0 टक्के बियाणे जास्त वापरून दोन ओळीतील अंतर कमी करुन झाडांची संख्या वाढविली पाहिजे. त्याचप्रमाणे मका, सोयाबीन व तूर या पिकांची पेरणी करण्यास हरकत नाही. जिल्ह्यात पावसाची हजेरी जिल्ह्यातील लोणार, सुलतानपूर व दुसरबीड परिसरात काल पावसाने तुरळक हजेरी लावली होती. आज मलकापूर, खामगाव, बुलडाणा परिसरात पाऊस झाला त्यामुळे जिल्हावासीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. संध्याकाळी बुलडाणा शहर व परिसरातही पावसाच्या सरी कोसळल्याने नवी उमेद निर्माण झाली आहे. दररोज ढग दाटून येतात; मात्र पाऊस येत नसल्याने जिल्हाभर निराशेचे ढग जमा झाले आहेत.

Web Title: Waiting for universal rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.