महामार्गावरील झाडे लावण्याच्या तरतुदीकडे अक्षम्य दुर्लक्ष!
By Admin | Updated: April 18, 2017 01:02 IST2017-04-18T01:02:42+5:302017-04-18T01:02:42+5:30
मलकापूर- गेल्या चार ते पाच वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग क्र.६ च्या चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. त्यात मलकापूर ते अकोला दरम्यान हजारो झाडे तोडली गेलीत.

महामार्गावरील झाडे लावण्याच्या तरतुदीकडे अक्षम्य दुर्लक्ष!
हनुमान जगताप - मलकापूर
गेल्या चार ते पाच वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग क्र.६ च्या चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. त्यात मलकापूर ते अकोला दरम्यान हजारो झाडे तोडली गेलीत. अर्थात झाडे पुन्हा लावण्याची तरतूद निविदेत असल्याची माहिती आहे; मात्र त्यासंदर्भात हालचाली नाहीत. दुसरीकडे कमाल तापमानामुळे पर्यावण संतुलन बिघडल्याने त्या झाडांच्या लागवडीचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पर्यावरणप्रेमी त्यासंबधी चिंता व्यक्त करताना दिसत आहेत.
केंद्र शासनाच्या दळणवळण व वाहतूक विभागाच्या अखत्यारित राष्ट्रीय महामार्ग क्र.६ च्या चौपदरीकरणाची सुरुवात झाली आहे. किमान तीन ते चार वर्षात महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपेक्षित होते; मात्र भूसंपादन व निविदा याखेरीज लाभार्थ्यांच्या लाभाचा प्रश्न अशा विविध कारणावरुन रखडत पडलेले महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली पाच वर्षे मजल दरमजल स्वरुपात सुरू आहे.
एकीकडे महामार्ग ६ च्या चौपदरीकरणाचे विविध अडचणी आल्या मात्र रस्त्यालगतच्या झाडांची कटाई मात्र जोमात झाल्याच सर्वश्रृत आहे. त्याच धरतीवर अकोला विभागात अकोला, बाळापूर, खामगाव, नांदुरा व मलकापूर या तालुक्यातर्गत मोडणाऱ्या महामार्ग ६ च्या शेजारील हजारो झाडांची कटाई मात्र निर्धारित वेळेतच झाल्याचे दिसते.
महामार्गाचे चौपदरीकरण करताना लगतच्या भागात झाडे लावणे, त्यांचे संगोपन करणे आदी बाबी कामाच्या निविदेत असल्याची माहिती आहे. त्यामुळे झाडांची लागवड व संगोपन संबंधी कंपनी करणार, ही बाब अपेक्षित आहे; मात्र सध्या तरी त्यासंबंधीच्या हालचाली दिसत नाहीत. किब्ांहुना महामार्गाचे चौपदरीकरणाचे कामच मुळात या ना त्या कारणावरुन अडगळीत पडल्याने अशात वृक्ष लागवडीचा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत राहतो.
दरम्यान, उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कमाल तापमान ४४ पर्यंत पोहोचल्याने पर्यावरण संतुलन बिघडल्याचे स्पष्ट होते. अशा परिस्थितीत महामार्गाच्या निर्मितीसाठी रस्त्यालगतच्या तोडण्यात आलेल्या ‘त्या’ हजारो झाडांच्या लागवडीचा त्यांच्या संवर्धनाचा प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आला आहे.
यासबंधी केंद्र शासनाच्या वाहतूक व दळणवळण विभागाकडे पुराव्याची तयारी स्थानीय पर्यावरण प्रेमी व समाजिक यांनी चालविल्याची माहिती आहे. कारण महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामास निर्धारित वेळेपेक्षा जास्त अवधी जातो म्हटल्यावर ‘त्या’ हजारो झाडांच्या लागवडीसंबंधी पर्यावरण प्रेमी चिंता व्यक्त करताना दिसत असून तुर्तास ‘त्या’ झाडांच्या कटाईचा मलकापूर ते अकोला दरम्यानच्या पर्यावरणावर परिणाम होत असल्याचे स्पष्ट होते.
लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा
राष्ट्रीय महामार्ग ६ च्या चौपदरीकरणात मलकापूर ते अकोला दरम्यान हजारो झाडांच्या कटाईमुळे पर्यावरण संतुलनावर परिणाम होत आहे. त्यासाठी या भागातील लोकप्रतिनिधींनी रस्त्यालगत निवीदेत नमुद झाडांची लागवड व संगोपन यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची गरज प्रतिपादीत होत असून सुदैवाने केंद्राचे वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी विदर्भातीलच आहेत त्यामुळे या कामी यश येवू शकते.