अडीच लाख केशरी कार्डधारकांना फटका

By Admin | Updated: July 22, 2015 23:37 IST2015-07-22T23:37:48+5:302015-07-22T23:37:48+5:30

अन्न सुरक्षा योजनेतील गरिबांचे धान्य केले बंद; जिल्ह्यातील २ लाखावर केशरी कार्डधारकांना फटका.

Twenty-five lakh cash-starved card holders | अडीच लाख केशरी कार्डधारकांना फटका

अडीच लाख केशरी कार्डधारकांना फटका

बुलडाणा : अन्न सुरक्षा योजनेत समावेश न करण्यात आलेल्या राज्यातील तब्बल पावणेदोन कोटी केशरी कार्डधारक गरीब नागरिकांचे रेशनचे धान्य राज्य सरकारने बंद केले. या निर्णयामुळे जिल्ह्यातील २ लाख ६६ हजार केशरी कार्डधारकांना फटका बसण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांपासून केशरी कार्डधारक नागरिकांना रेशन दुकानातून माफक दरात गहू, तांदूळ मिळालेले नाही. एकीकडे महागाई व साठेबाजीमुळे धान्याचे भाव वाढत आहेत. आता नागरिकांना दोन वेळचे जेवण मिळणे कठीण झाले आहे. असे असताना राज्य सरकारने आपल्या तिजोरीवरील भार कमी करण्यासाठी गरिबांचे धान्य बंद करून त्यांच्या तोंडचा घास हिरावण्याचा प्रयत्न केला आहे. बुलडाणा जिल्ह्याची लोकसंख्येत २८ लाख एवढी असताना यापैकी १५ लाख ४0 हजार नागरिक अन्न सुरक्षा योजनेत सहभागी करण्यात आले होते. या नागरिकांना दोन रुपये किलो प्रमाणे गहू व तीन रुपये किलो प्रमाणे तांदूळ दिला जातो तसेच स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणारे जिल्ह्यात २ लाख ६६ हजार ९२८ हे एपीएल म्हणजे केशरी कार्डधारक आहेत. या केशरी कार्डधारक (एपीएल) नागरिकांनाही स्वस्त धान्य योजनेचा लाभ मिळावा म्हणून शासनाने गहू व तांदूळ असे एकूण १५ किलो धान्य देण्याची योजना सुरू केली होती; मात्र यामुळे शासकीय तिजोरीवर अतिरिक्त भार पडत असल्याचे कारण पुढे करून केशरी कार्डधारकांना मिळणारे रेशनचे धान्य बंद करण्यात आले आहे. गत काही महिन्यांपासून केशरकार्डधारकांना धान्यवाटप बंद आहे. शासनाने घेतलेल्या नवीन निर्णयाबाबत अद्यापही आदेश प्राप्त झालेला नाही. पुरवठा विभागाकडून आदेश प्राप्त होताच त्यांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे तालुका पुरवठा अधिकारी पी. के. सुरडकर यांनी स्पष्ट केले. आर्थिक ताण वाढणार शासकीय त्रुटींमुळे अनेक नागरिकांचा बीपीएलमध्ये व अन्न सुरक्षा योजनेत समावेश होऊ शकलेला नाही, अशा केशरी कार्डधारक (एपीएल) नागरिकांनाही स्वस्त धान्य योजनेचा लाभ मिळावा म्हणून शासनाने ७.२0 रुपये प्रतिकिलो दराने १0 किलो गहू व ९.६0 रुपये प्रतिकिलो दराने पाच किलो तांदूळ असे एकूण १५ किलो धान्य देण्याची योजना सुरू केली होती. स्वस्त दरात मिळणार्‍या या धान्यामुळे एका कुटुंबाचा महिनाभराचा धान्यावरील खर्च कमी होऊन इतर जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी तोच पैसा कामी येत होता. शासनाच्या या निर्णयामुळे आता केशरी कार्डधारक कुटुंबांचा आर्थिक ताण वाढणार आहे.

Web Title: Twenty-five lakh cash-starved card holders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.