त्रिकोणी लढतीची चिन्हं, विकासाच्या मुद्यांना बगल!
By Admin | Updated: June 12, 2014 20:52 IST2014-06-12T20:50:00+5:302014-06-12T20:52:01+5:30
जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाची निवडणूक रंजक ठरण्याची चिन्हं दिसत आहेत.

त्रिकोणी लढतीची चिन्हं, विकासाच्या मुद्यांना बगल!
जळगाव : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण असले, तरी त्रिकोणी लढतीची शक्यता असल्याने जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाची निवडणूक रंजक ठरण्याची चिन्हं दिसत आहेत.
लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे प्रतापराव जाधव यांना जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात जवळपास २६ हजाराचे मताधिक्य मिळाले. त्यामुळे या मतदारसंघात भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भाजपाचे विद्यमान आमदार डॉ. संजय कुटे यांची उमेदवारी निश्चित असल्याचे मानले जाते. आपल्या कार्यकाळात पाणीपुरवठा योजनेसारखी केलेली कामं घेऊन, ते निवडणूक मैदानात उतरण्याची तयारी करीत असताना, इतर पक्षांमध्ये मात्र उमेदवारीसाठीच रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
ऐनवेळी उमेदवारी जाहीर करणे, ही काँग्रेसची प्रथाच असून, त्यामुळे उमेदवाराचे आणि पर्यायाने पक्षाचेही नुकसान होते. यावेळीही काँग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांची यादी मोठी आहे. कुणालाही उमेदवारी जाहीर झाली की, अन्य नेते काँग्रेसचे अन्य इच्छुक उमेदवार जीव ओतून काम करीत नाहीत. सध्या रामविजय बुरुंगले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील, अंजलीताई टापरे, डॉ. एस.के.दलाल, जिल्हा परिषद सदस्य सौ. ज्योतीताई टापरे, संजय उमरकर हे काँग्रेसच्या उमेदवारीसाठी शर्यतीत आहे. २00९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रामविजय बुरुंगले हे तिसर्या क्रमांकावर होते. त्यांना ४३ हजार २२0 मते मिळाली होती. त्यावेळी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी त्यांच्या विरोधात छुप्या पद्धतीने काम केले होते. याशिवाय बुंरुगले यांचे नाव जळगाव व संग्रामपूर तालुक्यासाठी नवीन होते. यावेळी तशी परिस्थिती राहणार नाही, हे खरे; मात्र त्यांना उमेदवारी मिळते की नाही, हे मात्र निश्चित नाही. त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडते, हे महत्वाचे राहणार आहे.
गत निवडणुकीत भारिप-बमसंचे प्रसेनजीत पाटील यांनी दुसर्या क्रमांकाची, ४५ हजार १७७ मतं मिळवून पक्षाला उभारी दिली होती. केवळ चार हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता. त्यांना उमेदवारी मिळाली तर निवडणुकीत रंगत येण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे मनसेचे जिल्हाप्रमुख गजानन वाघ यांनीही रणशिंग फुंकले आहे. पक्षाने त्यांना उमेदवारी दिली, तर ती भाजपसाठी अडचणीची राहणार आहे. मेहकर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर जळगाव जामोद काँग्रेसकडे आहे. जागा वाटपादरम्यान जळगाव जामोद मतदारसंघ स्वत:कडे घेण्याचे प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू असले, तरी प्रत्यक्षात तसे होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या पक्षाच्या इच्छुक उमेदवार डॉ. सौ. स्वातीताई वाकेकर यांना प्रतिक्षाच करावी लागण्याची शक्यता आहे.
या मतदारसंघात प्रत्येक निवडणुकीत जातीय समीकरणांचाच प्रभाव राहीला आहे. २00४ च्या निवडणुकीत पाटील समाजाचा प्रभावी उमेदवार नसल्याने, या समाजाने भाजपचे डॉ.कुटे यांना यांच्या विजयासाठी हातभार लावला. २00९ च्या निवडणुकीत माळी समाजाचा सशक्त उमेदवार नसल्याने, या समाजानेही भाजपलाच पाठिंबा दिला. आगामी विधानसभा निवडणुकीत या दोन्ही समाजाचे नेमके कोणते उमेदवार मैदानात उतरतात, यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे.
माजी आ. स्व. तुळशिरामजी ढोकणे यांचे पुत्र प्रकाश ढोकणे यांची भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढविण्याची इच्छा आहे; मात्र भाजपकडून त्यांना सध्यातरी फारसा प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसत नाही.
प्रत्येक निवडणुकीत विकासाच्या मुद्दे बाजुला पडल्याचे चित्र पहावयास मिळते. यंदाची निवडणूकही विकासाच्या मुद्यावर होते की, पुन्हा जातीय समिकरणंच प्रभावी ठरतात, यावरही बरंच काही अवलंबून राहणार आहे.