आज घटमांडणी, उद्या भविष्यवाणी
By Admin | Updated: April 28, 2017 00:16 IST2017-04-28T00:16:01+5:302017-04-28T00:16:01+5:30
जळगाव: बहुचर्चित भेंडवळची घटमांडणी उद्या, २८ एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सायंकाळी सूर्यास्तासमयी पुंजाजी महाराज व सारंगधर महाराज करणार आहेत.

आज घटमांडणी, उद्या भविष्यवाणी
भेंडवळच्या भाकिताकडे शेतकऱ्यांचे लक्ष!
जळगाव: बहुचर्चित भेंडवळची घटमांडणी उद्या, २८ एप्रिल रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सायंकाळी सूर्यास्तासमयी पुंजाजी महाराज व सारंगधर महाराज करणार आहेत, तर घटामध्ये रात्रभरात झालेल्या बदलाचे अवलोकन करून २९ एप्रिलच्या पहाटे यंदाच्या घटमांडणीची भविष्यवाणी कथन करणार आहेत. या भाकिताकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
३०० वर्षांपूर्वी हवामान खाते, पाऊस पाण्याविषयी माहिती देणारी कुठलीही सुविधा उपलब्ध नसताना भेंडवळमधील वाघ वंशाचे पूर्वज चंद्रभान महाराज यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरलेल्या भेंडवळ घटमांडणीची सुरुवात केली आणि ती परंपरा या वाघ कुटुंबीयांनी आजही जपली आहे.
या विधीसाठी नियमांचे काटेकोरपणे पालन करून चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आज संध्याकाळी गावाच्या पूर्वेस असलेल्या शेतात सूर्यास्ताच्यावेळी सारंगधर महाराज व आपल्या सहकार्यासह येवून चंद्रभान महाराजांचा जयजयकार करीत घटमांडणी करणार आहेत. घटमांडणीनंतर रात्रभर त्या परिसरात कुणीही फिरकत नाही. अशा परिस्थितीत रात्रीच्या पोटात घटामध्ये नैसर्गिकरीत्या जे काही बदल घडून येतात, त्याबाबत दुसऱ्या दिवशी उपस्थित हजारो शेतकऱ्यांच्या समक्ष येणाऱ्या हंगामाचे पीक पावसाचे तसेच देशाचे राजकीय तथा नैसर्गिक संकटांबाबत चाहूल देणारे भाकीत वर्तविण्यात येते. यावरून यंदा देशाचा राजा बदलणार काय? की तोच कायम राहणार, याचा उलगडा होणार आहे.
अशी होणार घटमांडणी
अक्षय्य तृतीयेला संध्याकाळी पुंजाजी महाराज, सारंगधर महाराज आपल्या अनुयायांसह चंद्रभान महाराजांचा जयजयकार करीत नियोजित शेतात येतात. त्याठिकाणी मातीचा गोल घट करून घटाच्या मधोमध खड्डा करतात. यामध्ये पावसाळ्याच्या चार महिन्याचे प्रतीक म्हणून चार मातीची ढेकळे ठेवतात. त्यावर घागर ठेवण्यात येते. या घागरीवर पापड, पुरी, सांडोळी, करंजी, भजा आणि वडा अशा प्रतीकात्मक खाद्य पदार्थांची मांडणी केली जाते, तर खड्ड्यात घागरीच्या बाजूला राजा व त्याची गादी म्हणजे पान-सुपारी ठेवली जाते, तर मातीच्या घटामध्ये गोलाकार पद्धतीने अंबाडी, गहू, ज्वारी, बाजरी, कपाशी, हिवाळी मूग, उडीद, करडी, तांदूळ, जवस, तीळ, मसुर, हरभरा, वाटाणा, भादली इत्यादी १८ प्रकारच्या धान्याची मांडणी करतात.
धान्य आणि खाद्यपदार्थांचा वापर करून या घटमांडणीतून झालेल्या बदलाचे दुसऱ्या दिवशी पहाटे अतिशय सूक्ष्म पद्धतीने अवलोकन केले जाते आणि त्यावरून भाकिते वर्तविली जातात. मगच शेतकरी पेरणीची दिशा ठरतो.