दूषित पाण्यामुळे हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात!
By Admin | Updated: April 28, 2017 00:29 IST2017-04-28T00:29:14+5:302017-04-28T00:29:14+5:30
नागरिक पितात झऱ्यातील दूषित पाणी : पाण्यासाठी गावकऱ्यांची रानोमाळ भटकंती

दूषित पाण्यामुळे हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात!
किशोर मापारी - लोणार
तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे, त्यामुळे ग्रामीण भागात नागरिक नदी पात्रात खड्डे खोदून त्यामधील पाणी पित आहेत. हे पाणी दूषित असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
गेल्या चार वर्षाच्या दुष्काळाच्या खाईत सापडलेल्या लोणार तालुक्यात पाणीबाणीची परिस्थिती उद्भवली आहे. सरकारी खर्चाने मागील वर्षी टँकरने व विहिरी अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यात आला. पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्याने तालुका टँकरमुक्त होईल, असे दिसत होते; मात्र सध्या तापमान दिवसेंदिवस वाढत असल्याने भूगर्भातील पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. गावोगावी पाणीपुरवठा योजनांचा बोजवारा झालेला असल्यामुळे टँकरची मागणी पुढे येत आहे. लोणार शहरातील नागरिकांनाही नदीच्या झिऱ्यातून पाणी काढून प्यावे लागत आहे. याच नदीतून शहरातील सांडपाणीही वाहते. त्यामुळे हे पाणी दूषित असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
गेल्या वर्षी सरासरीपेक्षा तालुक्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. तर काही ठिकाणी अल्पस्वरूपाचा पाऊस पडल्याने त्याचा परिणाम शेती उत्पन्नावरही झाला. तालुक्यातील जनतेला भीषण पाणीटंचाईतून मुक्त करण्यासाठी विहिरी अधिग्रहण व टँकरची सुविधा करून पाणीपुरवठा मागील वर्षांपासून उन्हाळ्यात होत आहे; मात्र जलस्वराज, महाजलसारख्या ग्रामीण पाणी पुरवठा करण्यासाठी राबविण्यात आलेल्या योजना केवळ कागदोपत्रीच राबविल्याने आणि त्यात करोडो रुपयांचा घोटाळा संबंधित अधिकारी आणि गावपातळीवर असलेल्या समितीत हातमिळवणी झाल्याने गावकऱ्यांना गेल्या १५ वर्षांपासून पाण्यासाठी प्रत्येक उन्हाळ्यात भटकंती करावी लागत आहे. ठोस उपाययोजना होत नसल्याने तालुक्यातील जनतेला यावर्षीही भीषण पाणीसंकटाला तोंड द्यावे लागत आहे. तालुक्यातील पाण्याचे तलाव कोरडे पडत आहेत. विहिरी, कुपनलिका आदीच्या पाण्याने तळ गाठला आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी जनतेला रणरणत्या उन्हात वणवण भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांचे टँकरसाठीचे व विहिरी अधिग्रहणचे प्रस्ताव पंचायत समिती व तहसीलमध्ये दाखल झाले आहेत.
योग्य नियोजन नसल्याने नागरिकांचे हाल
काही गावात नियमित पाणी पुरवठा केला जात आहे; परंतु तेथे पाणी पुरवठा करण्याचे योग्य नियोजन नसल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. काही गावात तर असलेले नळ लोकांनी तोडून भंगारात विकण्यासाठी नेले आहेत, तर काही नादुरुस्त झाले असल्याने पाइपमधून पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे पाणी भरून झाल्यानंतरही पाण्याच्या समस्येपासून अनभिज्ञ असल्याने त्या गावात पाणी पुरवठ्याच्या वेळेस पावसाळ्यात वाहत असलेल्या नाल्यांप्रमाणे उन्हाळ्यातही नाल्या वाहत असल्याची स्थिती आहे. हे नळ पुन्हा लावण्याची, ते दुरुस्त करण्याची कोणतीही तरतूद तेथील ग्रामपंचायतीने केली नसल्याचे दिसत आहे. एकीकडे लोकांना, प्राणी, पक्षी व झाडांनाही जगण्यासाठी पाण्याची सोय नाही अन् दुसरीकडे पाण्याची नासाडी बघता केवळ कागदी आराखडा तयार न करता या बाबीकडे गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे.