पटसंख्या पूर्ततेसाठी शिक्षकांची धावाधाव!

By Admin | Updated: May 2, 2017 00:16 IST2017-05-02T00:16:12+5:302017-05-02T00:16:12+5:30

निकालाच्या तारखा लांबल्या : शाळा सोडण्याचा दाखला देण्यासही टाळाटाळ

Teacher rolls for the rolls! | पटसंख्या पूर्ततेसाठी शिक्षकांची धावाधाव!

पटसंख्या पूर्ततेसाठी शिक्षकांची धावाधाव!

खामगाव : इंग्रजी शाळांची वाढती संख्या, इंग्रजी शिक्षणाची गरज व स्पर्धेच्या युगात पालकांची निर्माण झाली मानसिकता पाहता जिल्हा परिषद, नगर परिषद यासोबतच शासनाच्या अनुदानित शाळांमधील शिक्षकांना तुकड्या वाचविण्यासाठी पटसंख्येची पूर्तता करताना धावाधाव करावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
कधीकाळी प्रवेशासाठी देणगी द्यावी लागणाऱ्या, वशिला लावावा लागणाऱ्या शाळांमधील पटसंख्या आजरोजी घसरत आहे. पटसंख्या घटल्याने शिक्षक अतिरिक्त ठरू नयेत, यासाठी शिक्षकांनाच शाळा भरविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. इयत्ता चौथीचे निकाल लागण्याअगोदरच शिक्षकांनी गावभर दौरा सुरू केला आहे.
आमची शाळा कशी चांगली हे पटवून देत आपल्या पाल्यास आमच्याच शाळेत प्रवेश द्या, असा आग्रह केला जात आहे. यासाठी परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांनासुद्धा सोबत घेतले जात आहे.

शिक्षकांची मुले कोणत्या शाळेत ?
जिल्हा परिषदेच्या तसेच नगर परिषदेच्या शाळांवर कार्यरत असलेल्या अनेक शिक्षकांची मुले शहरातील कॉन्व्हेंट इंग्रजी शाळेत शिक्षण घेत आहेत. तसेच शहरातील नगर परिषद व इतर शासन अनुदानित शाळांमध्ये कार्यरत अनेक शिक्षकांची मुलांचे प्रवेशसुद्धा खासगी शाळांमध्ये आहे. मात्र आपण कार्यरत असलेल्या शाळेतील पटसंख्या घटू नये, यासाठी शिक्षक घरोघरी भेट देत आपली शाळा कशी चांगली आहे, हे पटवून देत प्रवेशासाठी आग्रह करीत आहेत. मात्र, काही सडेतोड पालक अशा शिक्षकांना आपल्या शाळेतील शिक्षण दर्जेदार असल्याबाबत आपला तरी विश्वास आहे का, तुमचा स्वत:चा मुलगा तरी तुमच्या शाळेत आहे का, असा प्रतिप्रश्न करुन निरुत्तर करीत आहेत.

दर्जेदार शिक्षणालाच महत्त्व
एकूणच स्पर्धेचे युग आल्याने आपली आर्थिक ऐपत नसतानाही आर्थिक चणचणीमुळे खस्ता खाणाऱ्या पालकांनासुद्धा आपला मुलगा चांगले शिक्षण देणाऱ्या शाळेत शिकावा, अशी अपेक्षा असते. शाळेला फी नाही, शैक्षणिक साहित्य मोफत मिळते यालासुद्धा अनेक पालक अव्हेरत चांगल्या शाळेत पाल्याचा प्रवेश करवून घेत आहेत. अशा शाळांची फी महागडी असली, तरी सामान्य पालकही असा खर्च उचलतात. त्यामुळे भविष्यात जेथे दर्जेदार शिक्षण मिळेल, विद्यार्थ्यांचे भवितव्य घडेल, अशा शाळांचेच भवितव्य चांगले राहील.

निकालही लांबले!
इयत्ता पहिली ते नवव्या वर्गांपर्यंत निकाल दरवर्षी १ मे महाराष्ट्रदिनी जाहीर करण्यात येतात. मात्र, अनेक शाळांनी यावर्षी निकाल लांबविले आहेत. वर्ग पहिली ते तिसरीचे निकाल जाहीर झाले आहेत. मात्र चौथीचे निकाल लांबणीवर टाकले आहेत. वर्ग १ ते ४ पर्यंत असणाऱ्या शाळांना ५ वा वर्ग जोडण्याची प्रक्रिया अनेक शाळांची सुरु झाली आहे. त्यामुळे आपलेच विद्यार्थ्यांनी दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतल्यावर विद्यार्थी कोठे शोधायचे, यामुळे निकालाची तारीख वाढविण्यात आली असून, शाळा सोडण्याचा दाखला देण्याससुद्धा टाळाटाळ केली जात आहे.

Web Title: Teacher rolls for the rolls!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.