टँकर बंद, पण टंचाई कायम!
By Admin | Updated: May 24, 2017 00:21 IST2017-05-24T00:21:13+5:302017-05-24T00:21:13+5:30
मलकापूरातील विविध गावांमध्ये पाणीटंचाईचे चटके, प्रशासनाकडून विहिरींचे अधिग्रहण

टँकर बंद, पण टंचाई कायम!
मनोज पाटील।
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : मागील वर्षीच्या तुलनेत यंदा तालुका पूर्णत: टँकरमुक्त झाला आहे. तीव्र पाणीटंचाई नसली तरी पिण्याच्या पाण्याचे चटके बऱ्याच गावातील ग्रामस्थांना सोसावेच लागत आहे. नैसर्गिकरीत्या असलेल्या पाणीसाठ्यावर विविध पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहेत. परंतु अद्यापही माय माऊलीच्या पाण्याच्या घागरी रिकाम्याच आहेत. पंचायत समिती प्रशासनाकडून पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ कृती आराखडा तयार आहे. तरीही ४ ते ५ दिवसांनी जर ग्रामस्थांना पाणी मिळत असेल तर दरवर्षी उद्भवणारी ही समस्या कायम स्वरूपी केव्हा निवारल्या जाईल? असा प्रश्न ग्रामीण जनता विचारू लागली असून लोकप्रतिनिधींच्या उदासिन धोरणामुळेच अद्यापही आश्वासनांच्या घागरी रिकाम्याच राहत असल्याचे वास्तव मलकापूर तालुक्यात प्रकर्षाने समोर आले आहे.
अशा परिस्थितीत गतवर्षी मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायत व वाकोडी (गाडेगाव), खामखेड, पिंपळखुटा, निमखेड व पिंपळखुटा बु. याठिकाणी एकूण १० टँकरव्दारे पाणी पुरवठा केला गेला. ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत सुरू असलेला हा पाणी पुरवठा नंतर १ जानेवारी २०१६ पर्यंत ६ टँकरवर तर त्यानंतर १ एप्रिल २०१६ पर्यंत ४ टँकरवर येवून १५ मे २०१६ रोजी बंद झाला. त्यापोटी अंदाजे ७५ ते ८० लाख रूपयेपर्यंत पंचायत समितीला खर्च करावा लागला असून जवळपास ६२ लाख रूपये त्या टँकरधारकांना देण्यात येवून उर्वरीत रक्कम अद्यापही शासनाकडून प्राप्त न झाल्याने देणे बाकी आहे. तर यंदा मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायत व वाकोडी (गाडेगाव) येथे नळयोजना कार्यान्वित झाली आहे. खामखेड येथे तात्पुरती पुरक नळ योजना मंजूर होवून योजना पूर्णत्वास गेली आहे. पिंपळखुटा येथे विहिर अधिग्रहण करून त्याव्दारे पाणी पुरवठा सुरळीत सुरू आहे. निमखेड व पिंपळखुटा बु. येथे बंधारा घेतल्यामुळे पाण्याची पातळी वाढली आहे. अशा कारणांमुळे टँकरव्दारे पाणी पुरवठा बंद असल्याबाबतची माहिती पंचायत समितीकडून देण्यात आली आहे.
तर याच पंचायत समितीकडून पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ यंदा २६ मार्च २०१७ रोजी वार्षिक आमसभेत सन २०१७-१८ च्या कृती आराखडा जाहीर करण्यात आला त्यानुसार १२ खाजगी विहिर अधिग्रहण करणे व खामखेड या एका गावाला टँकरव्दारे पाणी पुरवठा असणे अशी बाब या आराखड्यात स्पष्ट नमूद आहे. त्याचप्रमाणे वजीराबाद, खामखेड, गौलखेड, हरणखेड, पिंपळखुटा बु., निमखेड, वाघुड, आळंद, दुधलगाव बु., खडकी व पिंपळखुटा (महादेव) या व्यतिरिक्त मौजे बहापुरा येथील सावित्रीबाई फुले नगरमध्ये पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे विहिर अधिग्रहण प्रस्तावित असल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. त्यामुळे मलकापूर तालुका यंदा जरी टँकरमुक्त झाला असला तरी तीव्र पाणीटंचाई भेडसावणार नाही असा दावा पंचायत समिती प्रशासनाकडून केला जात आहे. हा दावा कितपत योग्य आहे यापेक्षाही तालुका अद्यापपावेतो पाणीटंचाईच्या समस्येपासून मुक्त झालेला नाही हेच येथील विदारक वास्तव आहे.
महत्वाचे म्हणजे मध्यंतरी तालुक्यातील पाणी पुरवठा योजनांकडे वीज वितरण कंपनीची थकीत बिले आहेत ती सुध्दा भरणा करण्यात न आल्याने वीज कंपनीने दोन वेळा या योजनांचा विद्युत पुरवठा खंडीत होता हे विशेष. त्याचप्रमाणे आजही ग्रामीण भागात या योजनांव्दारे ४ ते ५ दिवसाआड व तो सुध्दा केवळ अर्धातासच पाणी पुरवठा केला जातो. हा अर्धा तास पाणीपुरवठा व पाण्याची साठवण या बाबीचा मेळ बसविणे आता ग्रामीण जनतेला अवघड झाले आहे. उन्हाळ्यात अधिक प्रमाणात पाणी लागते ही गरज भागवण्याकरीता ग्रामस्थ व माय माऊलींना शेत शिवारातील विहिरींवरून पिण्याच्या पाण्याच्या घागरी भरून आणाव्या लागत असल्याचे चित्र तालुक्यात बऱ्याच गावात दिसत आहे.
अशी आहे विविध गावांमधील पाणी पुरवठ्याची स्थिती
मलकापूर तालुक्यात एकूण ६४ गावे असून १ लाख ४ हजार ५९८ अशी लोकसंख्या आहे. तालुक्यातील या गावांना एकूण ४ प्रादेशिक नळयोजनाव्दारे पाणी पुरवठा होतो. २२ गावं प्रादेशिक नळयोजना, पान्हेरा ५ गाव पाणी पुरवठा योजना, दाताळा १५ गाव पाणी पुरवठा योजना, मोरखेड १० गाव पाणी पुरवठा योजना अंतर्गत एकूण ३५ गावांना प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आहे व २० गावांना स्वतंत्र पाणी पुरवठा योजना अशा एकूण ५५ गावांना पाणी पुरवठा योजना आहेत तर २० गावांना विंधन विहिरीवरून विद्युत पंपाव्दारे पाणी पुरवठा करण्यात येतो. तालुक्यात एकूण २४८ हातपंप असून यापैकी बेलाड, रणथम, तांदुळवाडी, वरखेड, मोरखेड खुर्द या पाच गावातील हातपंप सहा महिने बंद तसेच भालेगाव व वाकोडी ही दोन गावे नऊ महिने हातपंप बंद असणारी गावे आहेत.
हरणखेड, आळंद, गौलखेड, पिंपळखुटा या गावात आजही पाणीटंचाईची समस्या आहे. पाणी पुरवठा योजनेव्दारे ८ ते १० दिवसांनी या गावात पिण्याचे पाणी मिळते. त्यामुळे महिला वर्गाला शेत शिवारातून विहिरींवरून पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे लागते. त्यामुळे येथे नवीन स्वतंत्र पाणी पुरवठा योजना कार्यान्वित होणे गरजेचे झाले आहे.
- ज्ञानदेव वाघोदे, माजी सभापती पंचायत समिती
तापत्या उन्हात या मे महिन्यात कुंड बु., कुंड खुर्द व तालसवाडा या तीन गावांमध्ये पाणी समस्या कमी अधिक प्रमाणात भेडसावत आहेत. २२ गावे पाणी पुरवठा योजनेव्दारा या गावांना ४-५ दिवसाआड होणारा पाणी पुरवठा मुबलक नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थ महिलांना पिण्याच्या पाण्याकरीता शेत शिवारांकडे भटकंती करावी लागते. प्रशासनाने ही समस्या निवारणार्थ उपाययोजना केली पाहिजे.
- सोपानराव शेलकर, जि.प. उपाध्यक्ष, रा.म्हैसवाडी,
निमखेड गावात बंधारा घेण्यात आला आहे पण त्यात गाळ साचला आहे. तर या बंधाऱ्यामुळे लगतच्या विहिरींची पाणी पातळी सुध्दा वाढलेली नाही. अर्ध्या तासातच या विहिरीतील पाणी संपते. याच विहिरीतील पाणी ग्रामस्थांना ४ ते ५ दिवसाआड पुरवल्या जाते.
- प्रविण क्षीरसागर पाटील
तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस निमखेड.
कुंड बु., कुंड खुर्द या गावात गत २-३ वर्षापासून पाणी समस्या कायम आहे. ही गावे तसेच धरणगाव हे २२ गावे पाणी पुरवठा योजनेत समाविष्ट आहेत. पूर्वी धरणगाव पाणी पुरवठा योजना अस्तित्वात होती. त्यानंतर २२ गावे पाणी पुरवठा योजना व आता धुपेश्वर येथून धरणगावला नळयोजना अस्तित्वात आली आहे. तरीही धरणगावला ८ ते १० दिवसांनी पिण्याचे पाणी मिळते. ही बाब आता ग्रामस्थांना चांगलीच सतावू पाहत आहे.
- विलासराव पाटील, माजी जि.प.सदस्य, रा.धरणगाव.