कर्जबाजारी शेतक-याची आत्महत्या
By Admin | Updated: September 5, 2015 00:05 IST2015-09-05T00:05:33+5:302015-09-05T00:05:33+5:30
भाऊसाहेब फुंडकर यांनी शेतक-यांसाठी आवाज उठवावा, अशी अपेक्षा चिठ्ठीतून केली व्यक्त.

कर्जबाजारी शेतक-याची आत्महत्या
खामगाव (बुलडाणा) : सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून एका ३८ वर्षीय शेतकर्याने शुक्रवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. भाजप नेते भाऊसाहेब फुंडकर यांनी शेतकर्यांसाठी आवाज उठवावा, अशी अपेक्षा या शेतकर्याने आत्महत्येपूर्वी लिहीलेल्या चिठ्ठीतून व्यक्त केली आहे.
खामगाव तालुक्यातील हिवरखेड येथील संजय सखाराम वाळोकार (वय ३८) या शेतकर्याकडे २ एकर शेती असून, त्यांच्यावर देना बँकेचे ४0 हजार रूपये कर्ज होते. सततची नापिकी आणि थकीत कर्जामुळे ते त्रस्त होते. अशातच कर्ज पुनर्गठण झाले नसल्याने, निराश झालेल्या संजय वाळोकार यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला. शुक्रवारी शेतातील झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. पंचनामा करताना पोलिसांना मृताजवळ चिठ्ठी आढळली. नापिकी, कर्जबाजारीपणामुळे आणि कर्ज पुनर्गठण न झाल्याने निराश होवून आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी चिठ्ठीत लिहीले आहे. भाऊसाहेब फुंडकर यांनी शेतकर्यांसाठी आवाज उठवावा, नाहीतर तरूण शेतकरी आत्महत्या करतील. शेतकर्याला खर्या मदतीची गरज आहे, अशा शब्दात या शेतकर्याने भावना व्यक्त केल्या आहेत.