ग्राहक मंचच्या आदेशाला स्टेट बँकेकडून केराची टोपली

By Admin | Updated: May 22, 2014 23:40 IST2014-05-22T22:53:09+5:302014-05-22T23:40:25+5:30

ग्राहक मंचाकडून बँकेच्या व्यवस्थापकाविरुध्द निकाल देऊन दोन महिन्याचा कालावधी होऊनही तक्रारकर्त्याचे खात्यात सदर धनादेशाची रक्कम जमा करण्यात आली नाही.

State Bank of India's Karaachi basket | ग्राहक मंचच्या आदेशाला स्टेट बँकेकडून केराची टोपली

ग्राहक मंचच्या आदेशाला स्टेट बँकेकडून केराची टोपली

संग्रामपूर : खात्यामध्ये धनादेश जमा झाला असतांना रक्कम जमा दिसत नसल्याची तक्रार करुनही येथील स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने दखल घेतली नाही. याबाबत ग्राहक मंचाकडून बँकेच्या व्यवस्थापकाविरुध्द निकाल देऊन दोन महिन्याचा कालावधी होऊनही तक्रारकर्त्याचे खात्यात सदर धनादेशाची रक्कम जमा करण्यात आली नाही. त्यामुळे ग्राहक मंचाचे आदेशाला बँकेने केराची टोपली दाखविल्याचे स्पष्ट होत आहे. वरवट बकाल येथील प्रा. सुभाष गुर्जर हे सप्टेंबर २0१२ मध्ये अमृतसर युनिर्व्हसीटी मध्ये रिप्रेशर कोर्स ट्रेनिंगसाठी २४ दिवसांकरिता गेले होते. तेथे राहण्याचा, खाण्याचा खर्चाच्या मोबदल्यात त्यांना ८00४ (आठ हजार चार) रुपये रकमेचा धनादेश क्र. 0४७५४९ देण्यात आला होता. हा धनादेश प्रा.सुभाष गुर्जर यांनी संग्रामपूर स्टेट बँक शाखेत जमा करणेसाठी दिला होता. तशी त्यांच्या पासबुकातही धनादेश जमा झाल्याची नोंद करण्यात आली मात्र त्या धनादेशाची रक्कम खात्यामध्ये जमा झाली नाही. त्यामुळे प्रा.सुभाष गुर्जर यांनी वेळोवेळी बँकेत जावून चौकशी केली तसेच बँकेचे शाखा व्यवस्थापक यांनाही विचारणा केली. मात्र प्रा.सुभाष गुर्जर यांना उडवाउडवीचे उत्तरे देण्यात आली. बँकेचे वरिष्ठ महाव्यवस्थापक मुंबई, सहाय्यक महाप्रबंधक क्षेत्र बुलडाणा यांचेकडे तक्रार केल्यावरही आठ महिन्याच्या काळात सदर रक्कम खात्यात जमा झाली नाही. अखेर प्रा.गुर्जर यांनी हे प्रकरण ग्राहक मंचात सादर केले. त्यांनी सादर केलेले पुरावे व कागदपत्रे यावरुन ही तक्रार खरी असल्याचे दिसून आले. ग्राहक मंचाच्या समितीकडून सर्व पडताळणी करण्यात आल्यावर याबाबतचा आदेश काढण्यात आला. त्यामध्ये बँकेच्या व्यवस्थापकाने 0४७५४९ क्रमांकाच्या धनादेशाची रक्कम ८00४ रुपये तक्रारकर्त्याला द्यावेत किंवा खात्यात जमा करावे. या रकमेवर बँकेचे व्याज देण्यात यावे, शारिरीक, मानसिक त्रासापोटी तक्रारकर्त्याला तीन हजार रुपये द्यावे, न्यायालय खर्चापोटी तक्रारकर्त्याला दोन हजार रुपये द्यावे. या आदेशाचे पालन आदेश पारीत केल्यानंतर ४५ दिवसाचे आत करावे, असेही यामध्ये सूचित करण्यात आले होते. हा आदेश १५ फेब्रुवारी २0१४ मध्ये पारीत केला होता. मात्र या आदेशाची मुदत १ एप्रिल रोजीच संपली तरीही बँकेच्या व्यवस्थापकाकडून या आदेशाचे पालन झाले नसल्याचे समजते व अद्याप तक्रारकर्त्याचे खात्यात सदर धनादेशाची रक्कम जमा करण्यात आली नाही, अशी माहिती प्रा.सुभाष गुर्जर यांनी दिली.

Web Title: State Bank of India's Karaachi basket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.