श्रींच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

By Admin | Updated: June 1, 2017 00:16 IST2017-06-01T00:16:50+5:302017-06-01T00:16:50+5:30

पालखी निघाली... पालखी निघाली... भक्तांसंगे गजानन माउली निघाली...!

Shree's Palkhi reached Pandharpur | श्रींच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

श्रींच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

गजानन कलोरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : ‘‘शेगावीचा राणा माहेरी निघाला। संगे संत मेळा भजनी रंगला।। लक्ष लक्ष कंठातूनी गावूनी अभंग । चंद्रभागा दंग झाली गजानन, गजानन ।। पंढरीत चैतन्याचा मोगरा फुलला ।शेगावीचा राणा माहेरी निघाला।।’’ अशा भक्तिमय गीतांनी भारावलेल्या वातावरणात बुधवारी गजानन महाराजांच्या पालखीने आषाढी यात्रेकरिता पंढरपूरकडे प्रस्थान केले. गज, अश्वासह हजारो भक्तांच्या पायदळ दिंडीसह पालखी सकाळी ७ वाजता मार्गस्थ झाली. यावेळी ‘‘पालखी निघाली...पालखी निघाली... भक्तांसंगे गजानन माउली निघाली...’’ यासह ‘गजानना’च्या जयघोषाने वातावरण भक्तिमय बनले होते.
संत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभााऊ पाटील यांच्या हस्ते श्रींच्या रजत मुखवट्याचे व विणेकरी, टाळकरी, वारकऱ्यांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पालखी संत गजानन महाराज संस्थानमधून प्रकटस्थळमार्गे नागझरीकडे रवाना झाली. यावेळी हजारो भाविकांची उपस्थिती होती. श्रींच्या पालखीच्या पूजनप्रसंगी विश्वस्त नीळकंठदादा पाटील, नारायणराव पाटील, अशोक देशमुख, गोविंदराव कलोरे, अध्यक्ष डॉ. रमेशचंद्र डांगरा, विश्वेश्वर त्रिकाळ, किशोर टांक, पंकज शितूत, चंदूलाल अग्रवाल यांची उपस्थिती होती.
प्रकटस्थळावर श्रींची आरती करण्यात आली. यावेळी मधुकर घाटोळ, एम.पी. पाटील, शरद शिंदे यांच्यावतीने वारकऱ्यांना चहा, फराळाचे वितरण करण्यात आले. नागझरी रोडवर अशोक देशमुख यांच्या मळ्यात वारकऱ्यांना चहा, नाश्ता देण्यात आला.

पाचशे वारकऱ्यांचा सहभाग
श्रींच्या पालखीसह निघालेल्या पायदळ दिंडीत पांढऱ्या शुभ्र गणवेशात सुमारे पाचशे वारकरी सहभागी होऊन शिस्तबद्ध पद्धतीने मार्गक्रमण करीत आहेत. पालखीसोबत रुग्णवाहिका, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व आवश्यक ती वैद्यकीय व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे.

Web Title: Shree's Palkhi reached Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.