फहीम देशमुख शेगाव (जि. बुलडाणा), दि. ५ : शेगावच्या रेल्वे स्टेशनवर उतरताच खमंग कचोरी खाण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. शेगावची ही कचोरी हळूहळू विदर्भातच नव्हे तर आता संपूर्ण देशासह परदेशात सर्वत्र पोहोचली असून, सुमारे ६६ वर्षांचा प्रदीर्घ पल्ला या कचोरीने गाठला आहे. देशाच्या फाळणीनंतर तिरथराम शर्मा नामक व्यक्ती पंजाबातून शेगावात पोहोचले. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी त्यांनी ५ जून १९५0 रोजी कचोरी सेंटर स्थापन केले. तिरथराम शर्मा यांनी कुटुंबीयांना कायमस्वरूपी व्यवसायाचा मंत्र दिला. यामध्ये त्यांनी रेल्वे स्टेशनवरील एका स्टॉलवर हॉटेल सुरू केले. १९५0 मध्ये आपल्या मुलांच्या मदतीने त्यांनी खास पद्धतीने तयार केलेल्या कचोरीची विक्री सुरू केली. शेगावला संत गजानन महाराजांच्या समाधी दर्शनासाठी येणार्या प्रत्येकाला या कचोरीने भुरळ घातली आहे. त्यांच्या पुढच्या पिढीने हा कचोरी निर्मिती आणि विक्रीचा वारसा यशस्वीपणे चालविला असून, एकेकाळी एका आण्याला विकणारी ही कचोरी आज ५ ते ६ रुपये एवढ्या किमतीला विकली जात आहे. शेगावला दरवर्षी हजारो भाविक गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येतात. येथे येणारा प्रत्येक जण कचोरीच्या लज्जतदारपणामुळे ती आपल्या गावालाही नेण्याचा मोह आवरू शकत नाही.
शेगाव कचोरी झाली ६६ वर्षांची !
By admin | Updated: August 6, 2016 02:12 IST