फलकांबाबत बियाणे विक्रेते उदासीन
By Admin | Updated: June 19, 2015 02:34 IST2015-06-19T02:34:28+5:302015-06-19T02:34:28+5:30
खामगावच्या बाजारात नियम धाब्यावर ; कृषी अधिका-यांचे दुर्लक्ष, ग्राहकांची लूट.

फलकांबाबत बियाणे विक्रेते उदासीन
खामगाव : खरिपाचा हंगाम सुरू झाला असून, सर्वत्र पेरणीची लगबग उडाली आहे. पेरणीसाठी खते, बी-बियाणे घेण्याकरिता बाजारपेठेत शेतकर्यांची गर्दी उसळलेली आहे; मात्र खते, बियाणे यांची विक्री करणार्या कृषिसेवा केंद्रांवर दर व साठय़ाबाबत माहिती देणारे फलक दुर्लक्षित आहे. बियाणे विक्री कायद्यानुसार प्रत्येक कृषिसेवा केंद्रासमोर मालाचा साठा व किंमत यांचा फलक असलाच पाहिजे. तो अनिवार्य आहे. या फलकाबाबत कृषिसेवा केंद्रसंचालक मात्र कमालीचे उदासीन असल्यामुळे शेतकर्यांची आर्थिक लूट होत आहे. या प्रकाराकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने केंद्रसंचालकांचे चांगलेच फावले आहे. खामगाव शहरात गुरुवारी बाजाराचा दिवस असल्याने चांगलीच गर्दी होते. शहरातील सरकी लाइन, टिळक पुतळा परिसर व बाजार समिती परिसरातील कृषिसेवा केंद्रांवर पाहणी केली असता, एकाही ठिकाणी पूर्ण माहिती दिलेला फलक आढळून आला नाही. अनेक केंद्रांवर खताच्या किंवा बियाण्यांच्या पिशव्यांमागे फलक झाकले होते, तर काही दुकानांमध्ये त्यावरील माहिती अद्ययावत नव्हती. वास्तविक, हे फलक ग्राहकाला दिसतील अशा ठिकाणी आणि वाचता येतील अशा अक्षरात लिहावे, हा नियम आहे. त्याचे शहरात कुठेही पालन होताना दिसले नाही. बियाणे विक्री कायद्यानुसार फलक लावणे अनिवार्य आहे. याबाबत चालढकल होत असेल, तर कृषी केंद्रांवर कारवाई केली जाईल, असे तालुका कृषी अधिकारी एम. डी. जाधव यांनी स्पष्ट केले.
* खुल्या बियाण्यांची चढय़ा भावाने विक्री
कृषिसेवा केंद्रासोबत रस्त्यावर खुल्या बियाण्यांची विक्रीही जोमात सुरू असून, मूग ११0 रुपये, उडीद १२0 रुपये, तूर ९0 रुपये, तर तीळ २00 रुपये प्रतिकिलो दराने बियाण्यासाठी दिले जात आहे. या बियाण्यांच्या उगवणक्षमतेबाबत मात्र कुठलीही खात्री नाही. तरीदेखील अव्वाच्या सव्वा भावाने विक्री होत आहे.