टाकळी वतपाळ गावाच्या पुनर्वसनाचे काम सुरू!
By Admin | Updated: March 18, 2017 00:56 IST2017-03-18T00:56:56+5:302017-03-18T00:56:56+5:30
जिगाव प्रकल्पग्रस्त गावाचे १३५ एकरामध्ये पुनर्वसन.

टाकळी वतपाळ गावाच्या पुनर्वसनाचे काम सुरू!
हिंगणे गव्हाड (जि. बुलडाणा), दि. १७- गेल्या २00८ पासून जिगाव प्रकल्पाचे मातीभिंतीचे नदीपात्रातील बांधकाम अतिशय जोमाने सुरू आहे. या जिगाव प्रकल्पामध्ये ३२ गावे पूर्णत: बाधित असून, १५ गावे ही अशंत: बाधित आहेत.
या ३२ गावांचे पुनर्वसन करण्याचे नियोजन पुनर्वसन विभागातून राबविले जात असून, या गावांचे पुनर्वसन करण्याकरिता तसेच निधीचा योग्य विनियोग करता यावा म्हणून या सर्व गावांचे पुनर्वसन करण्याकरिता जिगाव प्रकल्प धरण व पुनर्वसन विभाग शेगाव यांच्या पाच टप्पे राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये सहा गावांचे पुनर्वसन करण्यात येत आहे. त्यामध्ये जिगाव प्रकल्पांतर्गत टाकळी वतपाळ या गावांचे मोमीनाबाद शिवारामध्ये हिंगणे गव्हाड ते मोमीनाबाद रस्त्याने १३५ एकरामध्ये पुनर्वसन करण्यात येत आहे.
देवाशिस कन्स्ट्रक्शन औरंगाबादमार्फत कामाला जोमात सुरूवात झाली आहे. या पुनर्वसित वतपाळ गावामध्ये प्राथमिक शाळेचे बांधकाम, अंतर्गत रस्ते, त्यावरील पुलाचे बांधकाम उघडी गटाराचे बांधकाम करणे, ग्रामपंचायत भवन, समाज मंदिर, प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम, कोंडवाडा, प्रवेशद्वाराचे बांधकाम, सार्वजनिक शौचालये व गुरांसाठी हौदाचे बांधकाम, स्मशानभूमी रोडचे बांधकाम, बस थांबा यासह १८ जीवनावश्यक सुविधांचा यामध्ये समावेश आहे. याकरिता जिगाव प्रकल्प धरण व पुनर्वसन विभाग शेगाव यांच्याकडून कामांची पाहणी करण्यात येत आहे. लवकरच काम पूर्ण होणार आहे.