खळवाडीसाठी जमिनीच्या अदलाबदलीला मान्यता
By Admin | Updated: April 15, 2017 01:07 IST2017-04-15T01:07:45+5:302017-04-15T01:07:45+5:30
शेगाव विकास आराखडा : खळवाडी अतिक्रमकांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा

खळवाडीसाठी जमिनीच्या अदलाबदलीला मान्यता
फहीम देशमुख - शेगाव
मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या खळवाडीच्या जागेचा प्रश्न मार्गी लागला आहे. खळवाडी येथील २.६७ हे.आर. जमिनीच्या बदल्यात संस्थानच्या मालकीच्या असलेल्या अकोट रोडवरील ४.४५ हे.आर जमिनीच्या अदलाबदलीस महाराष्ट्र शासनाने नुकतीच मंजुरात प्रदान केली आहे. यामुळे आता येथील अतिक्रमकांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
शेगाव विकास आराखड्यांतर्गत ५०० कोटी रुपयांचा निधी शहराच्या विकासासाठी मंजूर झालेला आहे. मागील सात वर्षात आतापर्यंत ५० टक्के कामे झालेली असून, कामांची गती अत्यंत संथ व नागरिकांसाठी त्रासदायक असल्याने शहरवासी त्रस्त आहेत. अशातच श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना वाहने ठेवण्यासाठी १०० वर्षांपासून राहणाऱ्या खळवाडीतील नागरिकांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. गांधी चौकापासून सुरुवात होणाऱ्या, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते दोन मोरी व बालाजी फैलापर्यंत २.६७ हे. आर. जमीन शासन श्री संत गजानन महाराज संस्थानला बहुमजली वाहन तळासाठी देण्यास तयार झाली आहे.
याकरिता सर्व औपचारिकता पूर्ण झालेली असून, तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर महसूल व वन विभाग मंत्रालयाने ५ एप्रिल २०१७ रोजी खळवाडी येथील २.६७ हे.आर. जमिनीच्या बदल्यात गजानन महाराज संस्थानच्या मालकीच्या शेगाव-अकोट रोडवरील भूमापन क्र. ७८७/३, ७८८/२, ७९१, ७९२, ७९३/१, ७९३/३, ७९४/१ व ७१४/१ व ७१५/१ मधील ४.४५ हे.आर. जमीन खळवाडी येथील अतिक्रमकांच्या पुनर्वसनासाठी अदलाबदली करण्याच्या प्रक्रियेला शासनाने मंजुरी दिली आहे. यामुळे आता खळवाडी येथील अतिक्रमकांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
दुसरीकडे येथील नागरिकांचा पुनर्वसनाला प्रखर विरोध आहे. यामध्ये या भागाचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी कुठल्याही परिस्थितीत खळवाडीतील पुनर्वसन होऊ देणार नाही, असे जाहीर केलेले आहे.
मात्र, त्यांच्याच शासनाने या प्रक्रियेला अंतिम मंजुरी देऊ केली असल्याने आता येथील नागरिकांचे लक्ष आ.कुटे यांच्या पुढील पावलाकडे लागून आहे. महाराष्ट्र शासनाचे सहसचिव स.चं. मोंडकर यांनी काढलेल्या पत्रकानुसार राज्यातील सर्व संबंधित विभागाने तत्काळ पुढील कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.
शेगावातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी
७० हजार लोकसंख्येच्या या शहरात श्री संत गजानन महाराजांचे मंदिर असल्याने देशभरातील भाविक व आनंद सागर पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने या शहरात येतात. मात्र, रेल्वे स्थानक ते गजानन महाराज मंदिर याच १ कि.मी.च्या मार्गावर सर्व व्यवसाय व वर्दळ राहत असल्याने या भागातील जागांना खूप मागणी आहे. अशातच याच मुख्य मार्गालगतच्या खळवाडीची जागा शासन वाहनतळासाठी देत असल्याने नागरिकांची तीव्र नाराजी आहे. शहराबाहेरील एखादी जागा शासनाने वाहनतळासाठी द्यावी, अशी मागणी होत आहे.