पर्यावरणाचे जतन हीच खरी भक्ती -आचार्य वेरुळकर गुरुजी
By Admin | Updated: June 9, 2015 00:26 IST2015-06-09T00:26:12+5:302015-06-09T00:26:12+5:30
जळगाव जामोद तालुक्यातील आदीवासी गावात नानाविध बियांचे रोपण.

पर्यावरणाचे जतन हीच खरी भक्ती -आचार्य वेरुळकर गुरुजी
जळगाव जामोद (जि. बुलडाणा): दगडाच्या देवाला पाणी घालण्यात काही अर्थ नाही. यज्ञकुंडात आहुती टाकल्याने पुण्य मिळते किंवा नाही, हे मला माहीत नाही. आपली परंपरा वृक्षाला देवता मानते. झाडे जगाला, प्राणवायू देतात. २४ तास ऑक्सिजन देणारी झाडे पर्यावरणात आहे. म्हणून पर्यावरणाचे जतन करा, त्यातच खरी भक्ती आहे, असे प्रतिपादन गुरुदेव सेवा मंडळाचे आचार्य वेरुळकर गुरुजी यांनी केले.
आज ८ जून रोजी सातपुड्याच्या पायथ्याशी वडपाणी या आदिवासी गावामध्ये संवाद साधताना बोलत ते होते. पर्यावरण ग्रुप जळगाव जामोदच्या वतीने पर्यावरण वाचविण्यासाठी बीजारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या ठिकाणी पहिले बीजारोपण करून या उपक्रमाचा शुभारंभ आचार्य वेरुळकार गुरुजींनी केला. त्यानंतर येथील उजाड टेकड्यावर ५00 खड्डय़ांमध्ये जवळपास २ हजार बियांचे रोपण सर्वांंनी केली. खड्डय़ात सेंद्रिय खत, त्यावर बीज ठेवून मातीने झाकण्यात आले. पहिल्या पावसानंतर नैसर्गिकरित्या ही बीजे अंकुरणार आहे. त्याचबरोबर गावकर्यांनी संवाद साधताना त्यांनी या रोपांचे जतन करण्याचे आवाहनही करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष डॉ. स्वाती वाकेकर, लताताई तायडे, अनिताताई मिश्रा, पुष्पाताई कळसकार, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजय वानखडे, सचिन देशमुख, ठाणेदार एम.एस. भोगे, केशवदादा तेल्हारकर, वडपाणी गावाचे सरपंच ग्यानसिंग पर्यावरण ग्रुपचे सुनील भगत, जयदेव वानखडे, भीमराव पाटील, प्रा. श्याम फरफट, पंकज अग्रवाल, अजिंक्य टापरे, समाधान नानकदे, प्रा. अतुल ढोकणे, चतुर्भुज केला, शरद जाधव, डॉ. संदीप देशमुख, प्रा. राठोड, नीलेश राजूरकर, दीपक जाधव, यांच्यासह पर्यावरण मित्रांची उपस्थिती होती.