माती तलावांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:22 IST2021-06-30T04:22:30+5:302021-06-30T04:22:30+5:30
बुलडाणा : चिखली तालुक्यातील आमखेड येथील माती तलाव फुटल्यामुळे चिखली, सिंदखेड राजा आणि मेहकर तालुक्यातील लगतच्या भागातील शेतीचे मोठे ...

माती तलावांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
बुलडाणा : चिखली तालुक्यातील आमखेड येथील माती तलाव फुटल्यामुळे चिखली, सिंदखेड राजा आणि मेहकर तालुक्यातील लगतच्या भागातील शेतीचे मोठे नुकसान झाल्याने जिल्ह्यातील माती तलावांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागांतर्गत असलेल्या जलसंधारणाच्या ८६९ स्ट्रक्चरपैकी तब्बल १८८ स्ट्रक्चरची कामे प्राधान्यक्रमाने मार्गी लावण्याची गरज निर्माण झाली आहे.
आमखेड येथील दुर्घटनेनंतर यासंदर्भात माहिती घेतली असता जलसंधारण विभागाकडे (लोकल सेक्टर) १७ फेब्रुवारी २०२१च्या राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार ही कामे सोपविण्यात आली होती. मात्र अद्यापही या कामासंदर्भात हालचाली झालेल्या नाहीत. पावसाळ्यामुळे आता ही कामे दिवाळीनंतरच होतील, असे सूत्रांनी स्पष्ट केले. दुसरीकडे या १८८ स्ट्रक्चरपैकी ६२ स्ट्रक्चरची कामे करण्यास पूर्वीच प्रशासकीय मान्यता मिळाली होती. परंतु त्यासंदर्भातील निविदा झालेल्या नव्हत्या. आता या दुर्घटनेनंतर सुमारे आठ कोटी ५० लाख रुपयांच्या या कामांच्या निविदा काढण्यात येत असल्याचे जलसंधारण विभागाचे अधिकारी राजू झोरावत यांनी सांगितले. दरम्यान, आपण रुग्णालयात उपचार घेत असल्याचेही ते म्हणाले.
--जि.प. सिंचन विभागाचा डोलारा मोठा--
जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाकडे ७५ सिंचन तलाव, ३४५ पाझर तलाव, १९८ गाव तलाव आणि २०१ कोल्हापुरी बंधाऱ्याचे व्यवस्थापन आहे. या माध्यमातून १९ हजार ५०० हेक्टरच्या आसपास या विभागाची महत्त्म सिंचन क्षमता आहे. मात्र बहुतांश स्ट्रक्चर हे जुने झालेले आहे. त्यांच्या देखभाल दुरुस्तीचीही गरज निर्माण झालेली आहे.
-आमखेडचा माती तलाव जुना-
जिल्हा परिषदेंतर्गतचा आमखेडचा माती तलाव हा १९८०च्या दशकातला आहे. तो २८ जून रोजी झालेल्या दमदार पावसादरम्यान फुटल्याने या भागातील शेतीचे मोठे नुकसान झाले. परिसरातली अेाढ्यांनाही या काळात पूर आल्याने हे पाणी नदीनाल्यात सामावू शकले नाही व शेतीमध्ये ते घुसल्याने मोठे नुकसान झाले. दुसरीकडे आमखेडनजीकच असलेला अंबाशी येथील तलाव मात्र सुरक्षित असल्याचे जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाचे अभियंता पवन पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांनी पाहणी केली आहे.