गावकर्यांच्या तक्रारीवरून परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव
By Admin | Updated: August 11, 2014 00:04 IST2014-08-11T00:04:46+5:302014-08-11T00:04:46+5:30
स्वस्तधान्य दुकानदारांचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्याचा प्रस्ताव तहसिलदार गायकवाड यांनी जिल्हा पुरवठा अधिकार्यांकडे पाठविला आहे.

गावकर्यांच्या तक्रारीवरून परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव
लोणार : दक्षता समिती सदस्या आणि गावकर्यांच्या तक्रारीवरुन केलेल्या चौकशीत दोषी आढळलेल्या तालुक्यातील त्या स्वस्तधान्य दुकानदारांचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्याचा प्रस्ताव तहसिलदार गायकवाड यांनी जिल्हा पुरवठा अधिकार्यांकडे पाठविला आहे. त्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी त्या स्वस्तधान्य दुकानदारांचा परवाना रद्द करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तालुक्यातील काही ठिकाणी स्वस्तधान्य दुकानदारांकडून शिधापत्रिका धारकांना नियमानुसार स्वस्त धान्याचे वाटप न होणे, जादा दराने स्वस्त धान्याची विक्री करणे, स्वस्तधान्य दुकानात शासकीय नियमानुसार दर फलक न लावणे, रेकॉर्ड अद्ययावत न ठेवणे, दक्षता समितीची यादी न लावणे, शिधा पत्रिकाधारकांना अरेरावीची वागणूक देणे यासह अनेक कारणावरुन दक्षता समिती सदस्य सुमनताई डोईफोडे यांनी सदर स्वस्तधान्य दुकानदारांची जिल्हा पुरवठा अधिकारी आणि तहसिलदार गायकवाड यांच्याकडे तक्रार केली होती. तसेच त्यांच्या कारभाराची सखोल चौकशी करुन त्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली. त्यावरुन तहसिलदार गायकवाड यांच्या आदेशावरुन पुरवठा निरिक्षक अजय पिंपरकर यांनी तालुक्यातील स्वस्तधान्य दुकानाची सखोल चौकशी केली. त्यामध्ये पळसखेड येथील व्ही.एस.दराडे, किनगाव जट्ट येथील एस.बी.शेख, एस.आर.शेख, पि.आर.राठोड, हिरडव येथील एस.पी. रुणवाल, सावरगावमुंढे येथील बी.आर.मुंढे, गायखेड येथील एस.एस.पाटील, व्हि.के. सानप यांच्या स्वस्तधान्य दुकानामध्ये स्वस्तधान्य वितरण प्रणालीत त्रुट्या आढळून आल्या. पुरवठा निरिक्षक पिंपरकर यांच्या अहवालावरुन तहसिलदार गायकवाड यांनी या स्वस्तधान्य दुकानदारांचा परवाना कायस्वरुपी रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हा पुरवठा अधिकार्यांकडे पाठविला आहे. त्यामुळे सदर स्वस्तधान्य दुकानदारांवर काय कारवाई केल्या जाते, याकडे गावकर्यांचे लक्ष लागले आहे.