पालिकेच्या घरकुलांना ‘रहिवासी’ सापडेना!
By Admin | Updated: April 28, 2017 00:34 IST2017-04-28T00:34:32+5:302017-04-28T00:34:32+5:30
१४०० च्या वर घरकुलांसाठीचा २७ कोटी रुपयांचा खर्च पाण्यात!

पालिकेच्या घरकुलांना ‘रहिवासी’ सापडेना!
अनिल गवई - खामगाव
शहरात शासनाच्या योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करुन घरकुलांचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र घरकुलाचा लाभ मिळविण्यासाठी असलेले अतिक्रमण हटविण्याच्या तरतुरीमध्ये अनेकांनी राहते अतिक्रमण न सोडता घरकुलाचा लाभ घेतला नाही. परिणामी या घरकुलांना लाभार्थी मिळाले नाही. ज्यांनी घरकुल नावावर करुन घेतले अशांपैकी अनेकांनी घरकुल भाड्यावर दिले आहेत. त्यामुळे या घरकुलांच्या निर्मितीसाठी शासनाकडून करण्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात जात असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली.
बुलडाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी नगर पालिका म्हणून खामगाव नगरपालिकेचा नावलौकीक आहे. दरम्यान, शहरातील नागरिकांना घरकुलाची सुविधा देण्यासाठी खामगाव पालिकेच्यावतीने एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम टप्पा-१ अंतर्गत १४३० घरकुलांचे निर्माण करण्यात आले. या घरकुलांची निर्मिती करण्यापूर्वी शहरात विशेष सर्वेक्षण करून योजनेला सन २००७-०८ मध्ये मंजुरी देण्यात आली. त्यानंतर सन २०१० मध्ये सुमारे २७ कोटी रुपयांच्या खर्चांतून घरकुलांची निर्मिती करण्यात आली. मात्र आता रहिवाशी मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे.
नवीन यादीला गृहनिर्माण प्रतीक्षा !
शहरात १४३० घरकुलांची निर्मिती पुर्णत्वास आल्यानंतर या घरकुलाच्या वाटपासाठी लाभार्थ्यांशी पालिकेने संपर्क केला असता, केवळ १६८ लाभार्थ्यांनी लाभार्थी हिस्सा भरून घरकुलांमध्ये राहण्यास अनुकुलता दर्शविली. उर्वरित लाभार्थ्यांनी नकार देत, पालिकेच्या या घरकुल योजनेला धुळकावून लावले. या पार्श्वभूमीवर पालिकेने पुन्हा सर्वेक्षण, जाहीर सभा घेत नवीन लाभार्थ्यांची यादी तयार केली. मात्र, या यादीला अद्यापर्यंत जिल्हा गृहनिर्माण समितीचा हिरवा कंदील मिळालेला नाही.
घरकुलांमध्ये अतिक्रमण
शहरातील शंकर नगर, शेलोडी रोड, रावणटेकडी परिसरात लाभार्थ्यांनी राहण्यास नकार दिल्यानंतर, शहरातील तसेच ग्रामीण भागातील अनेकांनी या घरकुलांमध्ये अतिक्रमण केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून, काही ठिकाणी या घरकुलांची तोडफोड करण्यात आल्याचेही दिसून येते.
घरकुल नाकारण्याची लेखी कारणे
घरकुलाचा लाभ घेण्यास नकार देणाऱ्या लाभार्थ्यांनी पालिकेला, पक्के घर बांधले, स्थानांतरण केले, राहतेघर सोडून जाण्याची इच्छा नाही, या योजनेचा लाभ नको, वैयक्तिक कारणांमुळे अशी पाच कारणे लेखी दिली आहेत. तर ७६६ लाभार्थ्यांनी पालिका प्रशासनाला कोणताही प्रतिसाद दिले नाही.
कोट्यवधींचे नुकसान!
या घरकुलाच्या निर्मितीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला. मात्र, प्रत्यक्षात आतापर्यंत घरकुलांच्या लाभार्थी हिस्यापोटी पालिकेस आतापर्यंत केवळ २५ लक्ष रुपयांची रक्कम प्राप्त झाली आहे. त्यामुळे गेल्या सात वर्षांपासून लाभार्थी हिस्सा आणि इतर करापोटी कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे.