अन्नातून १०९ जणांना विषबाधा
By Admin | Updated: May 1, 2017 23:54 IST2017-05-01T23:54:56+5:302017-05-01T23:54:56+5:30
खामगाव : भागवत सप्ताहामधील महाप्रसाद घेतल्यानंतर अनेकांना मळमळ होऊन उलट्या सुरू झाल्या. यामुळे १०९ जणांना येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात येऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

अन्नातून १०९ जणांना विषबाधा
टेंभुर्णा येथील घटना : उपचारानंतर सुटी
खामगाव : भागवत सप्ताहामधील महाप्रसाद घेतल्यानंतर अनेकांना मळमळ होऊन उलट्या सुरू झाल्या. यामुळे १०९ जणांना येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात येऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले. ही घटना तालुक्यातील टेंभुर्णा येथे ३० एप्रिलच्या रात्री घडली.
टेंभुर्णा येथील संजय काळणे यांच्यावतीने यावर्षीही आयोजित भागवत सप्ताहाची रविवारी सांगता झाली. यानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. दुपारनंतर गावातील नागरिकांनी वरण, भात, वांग्याची भाजी, डालडा असा महाप्रसाद घेतल्यानंतर रात्री अनेकांना मळमळ व उलटीचा त्रास सुरू झाला. यामुळे अशांना सामान्य रुग्णालय खामगाव येथे उपचारासाठी आणण्यात आले. हळूहळू हा आकडा वाढून १०९ पर्यंत पोहोचला. रुग्णांची संख्या वाढल्याने निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश टापरे यांनी स्वतंत्र वार्ड सुरू करून सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी तातडीने या रुग्णांवर उपचार केले. घटनेची माहिती मिळताच आ. अॅड. आकाश फुंडकर यांनीही रुग्णालयात धाव घेऊन रुग्णांची विचारपूस केली. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांना तातडीने उपचार सुरू करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, १ मे रोजी या रुग्णांना सुटी देण्यात आली. यातील मधुकर देवके यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना अकोला येथे हलविण्यात आले आहे.