अन्नातून १०९ जणांना विषबाधा
By Admin | Updated: May 1, 2017 19:52 IST2017-05-01T19:52:52+5:302017-05-01T19:52:52+5:30
खामगाव : भागवत सप्ताहामधील महाप्रसाद घेतल्यानंतर अनेकांना मळमळ होवून उलटी सुरु झाल्या. यामुळे सुमारे १०९ जणांना येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात करण्यात आले.

अन्नातून १०९ जणांना विषबाधा
टेंभूर्णा येथील घटना : उपचार करुन सुटी
खामगाव : भागवत सप्ताहामधील महाप्रसाद घेतल्यानंतर अनेकांना मळमळ होवून उलटी सुरु झाल्या. यामुळे सुमारे १०९ जणांना येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात येवून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. ही घटना तालुक्यातील टेंभूर्णा येथे ३० एप्रिल रोजी रात्री घडली.
टेंभुर्णा येथील संजय काळणे यांच्यावतीने यावर्षीही आयोजित भागवत सप्ताहाची रविवारी सांगता झाली. यानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. दुपारनंतर गावातील नागरिकांनी वरण, भात, वांग्याची भाजी, डालडा असा महाप्रसाद घेतल्यानंतर रात्री अनेकांना मळमळ व उलटीचा त्रास सुरु झाला. यामुळे अशांना सामान्य रुग्णालय खामगाव येथे उपचारासाठी आणण्यात आले. हळूहळू हा आकडा वाढून १०९ पर्यंत पोहोचला. रुग्णांची संख्या वाढल्याने निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.निलेश टापरे यांनी स्वतंत्र वार्ड सुरु करुन सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी तातडीने या रुग्णांवर उपचार केले. घटनेची माहिती मिळताच आ. अॅड. आकाश फुंडकर यांनीही रूग्णालयात धाव घेवून रूग्णांची विचारपूस केली तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांना तातडीने उपचार सुरू करण्याचे निर्देश दिले. दरम्यान १ मे रोजी या रुग्णांना सुटी देण्यात आली. तर यातील प्रकृती अत्यवस्थ असल्याने यातील मधूकर देवके यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे.