१ आॅगस्ट पासून विना अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांचा बेमुदत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 13:26 IST2017-07-31T13:26:51+5:302017-07-31T13:26:51+5:30

१ आॅगस्ट पासून विना अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांचा बेमुदत बंद
मेहकर : आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानीत उच्च
माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय कृती समितीचेवतीने १ आॅगस्ट पासून
बुलडाणा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व विनाअनुदानीत कनिष्ठ
महाविद्यालये बंद करुन आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलनास
सुरूवात करणार आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील विनाअनुदानीत कनिष्ठ महाविद्यालयाची संख्या
जवळपास ३ हजारच्यावर आहे. सदर महाविद्यालयात सुमारे २२ हजार ५०० शिक्षक
गेल्या १५ वर्षापासून विना वेतन ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. सन २०१४
मध्ये सरकारने या महाविद्यालयाच्या शासन आदेशातील ‘कायम’ शब्द काढून
आर्थिक अनुदानासाठीची मुल्यांकन प्रक्रिया पूर्ण केली. आजपर्यंत सुमारे ३
वर्ष संपूणही मुल्यांकन पात्र ठरलेल्या कनिष्ठ महाविद्यालयाची यादी घोषीत
केली नाही. याबाबत कृती समितीने राज्यात जवळपास २०० च्यावर आंदोलने केली.
मात्र शासनाच्या उदासिनतेमुळे व वेळकाढूपणामुळे फक्त आश्वासनावरच बोळवण
केली गेली. सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर १
आॅगस्ट २०१७ पासून राज्यातील सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ
महाविद्यालये १०० टक्के बंद करुन आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे
आंदोलनास बसत आहे. या आंदोलनात कनिष्ठ महाविद्यालये बंद ठेवून सहभागी
व्हावे, असे कृतीसमितीचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष प्रा.गजानन निकस,
उपाध्यक्ष प्रा.अमोल डुकरे, सचिव प्रा.सुखदेव सरदार, प्रा.रविंद्र हाडे,
प्रा.रविंद्र जवंजाळ, प्रा.विशाल आंबेकर, प्रा.विजय वानखेडे, प्रा.गाढे,
प्रा.चरखे, प्रा.कलोरे यांनी कळविले आहे. (तालुका प्रतिनिधी)