कर्जमाफीसाठी मुंडन करून धरणात आंदोलन
By Admin | Updated: April 17, 2017 21:20 IST2017-04-17T21:20:08+5:302017-04-17T21:20:08+5:30
दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी होत आहे. पिकांना भाव नाही, पिकांचे उत्पादन कमी होत आहे

कर्जमाफीसाठी मुंडन करून धरणात आंदोलन
ऑनलाइन लोकमत
मेहकर (बुलडाणा), दि. 17 - दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी होत आहे. पिकांना भाव नाही, पिकांचे उत्पादन कमी होत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा गंभीर परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, तसेच बियाणे व खते मोफत द्यावे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पवन गाभणे यांनी मुंडन करून देऊळगाव माळी कोराडी धरणामध्ये १७ एप्रिल रोजी आंदोलन केले.
यावर्षी पिकांना भाव नाही, पिकांचे उत्पादन नाही, त्यामुळे बँकांचे कर्ज कसे फेडावे अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. शेतकऱ्यांकडून कर्जाची परतफेड होत नसल्याने विविध बँकांनी शेतकऱ्यांना नोटीस पाठविल्या आहेत. अशा बिकट परिस्थितीत शासनाने शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, तसेच बि-बियाणे, खते मोफत द्यावी, यासाठी देऊळगाव माळी मेहकर येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पवन सुरेश गाभणे यांनी १७ एप्रिलपासून कोराडीच्या धरणात पाण्यात बसून आंदोलन केले. दरम्यान तहसीलदार संतोष काकडे, मंडळ अधिकारी गंगाधर साळुंखे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा सह संपर्क प्रमुख डॉ.ज्ञानेश्वर टाले यांनी त्याठिकाणी जावून मागण्या मंजूर करण्याबाबत आश्वासन देऊन आंदोलनाची सांगता केली.