सूक्ष्म सिंचन योजनेची थकबाकी १५ एप्रिलपर्यंत अदा होणार!
By Admin | Updated: March 11, 2017 01:37 IST2017-03-11T01:37:44+5:302017-03-11T01:37:44+5:30
आ. हर्षवर्धन सपकाळ यांच्या मागणीवर ना. फुंडकरांची ग्वाही.

सूक्ष्म सिंचन योजनेची थकबाकी १५ एप्रिलपर्यंत अदा होणार!
बुलडाणा, दि. १0- सूक्ष्म सिंचन योजनेचे राज्यातील सर्व शेतकर्यांचे ६00 कोटींचे अनुदान १५ एप्रिलपर्यंंंत अदा केले जाईल, अशी ग्वाही राज्याचे कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. नियम २९३ अन्वये उपस्थित चर्चेत आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी सूक्ष्म सिंचन योजनेच्या अनुषंगाने शेतकर्यांची थकबाकी अदा करण्याबाबत केलेल्या मागणीच्या अनुषंगाने ना. फुंडकर यांनी सभागृहात हे आश्वासन दिले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात नियम २९३ अन्वये जलयुक्त शिवार या विषयाच्या अनुषंगाने चर्चा उपस्थित करण्यात आली होती. या चर्चेत सहभागी होताना आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्र राज्य हे सुजलाम् सुफलाम् करण्याची भाषा करणारे सत्ता पक्षाचे सरकार बुलडाणा जिल्ह्यातील २८ हजार शेतकर्यांना सूक्ष्म सिंचन योजनेची ८८ कोटींची थकबाकी अद्यापही देऊ शकलेले नाही. त्यामुळे सुजलाम् सुफलाम्च्या भाषेवर कितपत विश्वास ठेवावा, असा प्रश्न उपस्थित करून आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी ठिबक व तुषार सिंचन योजनेच्या अनुदानामुळे शेतकर्यांवर ओढवलेली बिकट परिस्थिती विशद केली. यावेळी आ. सपकाळ म्हणाले की, एकनाथ महाराजांच्या माध्यमातून शेतकर्यांना सूक्ष्म सिंचन योजनेच्या थकबाकीचा दिलासा मिळेल, असे अपेक्षित होते; परंतु ते पावले नाहीत. आता मात्र साक्षात पांडुरंगच आमच्या जिल्ह्यात असल्यामुळे ते आम्हाला पावतील, असा विश्वास असल्याचे मिश्कील भाष्य यावेळी केले. यावेळी कृषी मंत्री ना. पांडुरंग फुंडकर म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकर्यांची ६00 कोटी रुपयांची सूक्ष्म सिंचनाची थकबाकी आहे. आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलडाणा जिल्ह्याची वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली आहे. त्या अनुषंगाने ३१ मार्चपर्यंंंतचे खोटे आश्वासन न देता १५ एप्रिलपर्यंंंत बुलडाणा जिल्ह्यातील २८ हजार शेतकर्यांच्या ८८ कोटी थकबाकीसह राज्याची ६00 कोटी रुपयांची थकबाकी शेतकर्यांना अदा केल्या जाईल, असे सांगितले.