पर्यावरण संवर्धनासाठी महारॅली
By Admin | Updated: June 24, 2016 01:49 IST2016-06-23T23:26:21+5:302016-06-24T01:49:44+5:30
सिंदखेडराजा येथे सामाजिक वनीकरण व सामाजिक संस्थांद्वारे वृक्षारोपनाचा संदेश देत महारॅली काढली.

पर्यावरण संवर्धनासाठी महारॅली
सिंदखेडराजा(जि. बुलडाणा): पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाचा २ कोटी वृक्ष लागवड उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने 'एकच लक्ष्य, २ कोटी वृक्ष' हा संकल्प केला पाहिजे, असे प्रतिपादन पर्यावरण संवर्धन जनजागृती महारॅलीच्या उद्घाटनप्रसंगी नगराध्यक्ष गंगा तायडे यांनी केले.
शासनाची ही पर्यावरण संवर्धनाची चळवळ लोक चळवळ व्हावी, यासाठी २१ जून रोजी सिंदखेडराजा येथे सामाजिक वनीकरण, वन विभाग, निसर्गाई फाऊंडेशनद्वारा संचलित धरती बचाओ परिवार, भारत स्वाभिमान परिवार, पतंजली परिवार व शहरातील सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संवर्धन जनजागृती महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. महारॅलीची सुरुवात नगराध्यक्ष गंगा तायडे, उपाध्यक्ष सरस्वती मेहेत्रे, वनश्री जनाबापू मेहेत्रे यांच्या हस्ते वृक्षपूजनाने झाली. याप्रसंगी चांगेफळ येथील शाहीर शेजुळ यांचा पर्यावरणपूरक शाहिरी कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी सामाजिक वनीकरणचे जे.एस. डोईफोडे, ई.पी. सोळंके, धरती बचाओ परिवाराचे मुख्य कार्यकारी संचालक जनाबापू मेहेत्रे यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व विशद केले. याप्रसंगी मुख्याधिकारी गणेश माळी, काशिनाथ मेहेत्रे यांच्यासह शहरातील सेवाभावी संस्थेचे व परिवाराचे प्रतिनिधी आणि पर्यावरणप्रेमी हजर होते.