महाजल, जलस्वराज योजनांचा बट्ट्याबोळ!

By Admin | Updated: April 18, 2017 00:12 IST2017-04-18T00:12:03+5:302017-04-18T00:12:03+5:30

पाणीटंचाईचे एक कोटी रुपये पाण्यात : मेहकर तालुक्यात नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरुच

Mahajal, water-based schemes | महाजल, जलस्वराज योजनांचा बट्ट्याबोळ!

महाजल, जलस्वराज योजनांचा बट्ट्याबोळ!

मेहकर : उन्हाळ्यामध्ये दरवर्षी मेहकर तालुक्यात पाणी टंचाई निर्माण होते. या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पंचायत समितीच्यावतीने पाणी टंचाईचा कृती आराखडा तयार करण्यात येतो. मागील वर्षी निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तालुक्यातील काही गावांमध्ये महाजल व जलस्वराज योजना राबविण्यात येऊन जवळपास १ कोटी २० लाख रुपये खर्च करण्यात आला; मात्र या योजनांचा बट्ट्याबोळ झाला असून, पाणीटंचाई कायम आहे. यात पुन्हा यावर्षीच्या टंचाईची भर पडली असून, यावर्षीसुद्धा लाखो रुपये खर्च करावे लागणार आहेत.
मेहकर पंचायत समिती अंतर्गत जवळपास १४० गावे येतात. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मेहकर तालुक्यात अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होतो. मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यात तीव्र पाणीटंचाई जाणवत असते. अशा पाणीटंचाईचे निवारण करण्यासाठी पंचायत समितीकडून संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करुन तो मंजुरीसाठी जिल्हा स्तरावर पाठविण्यात येतो. दरम्यान, यावर्षीसुद्धा मेहकर तालुक्यात अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. पाणी टंचाई निवारण्यासाठी पं.स.स्तरावरून उपाय योजना सुरू आहेत. जवळपास ३८ गावांमध्ये विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव असून, सहा गावात टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रस्ताव आले आहेत. यामध्ये चार गावात टँकरने पाणीपुरवठा सुरु करण्यात आला असून, वरवंड व खंडाळा गावचा टँकरचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. दरवर्षी मेहकर तालुक्यात पाणी टंचाईवर लाखो रुपये खर्च करण्यात येतात; मात्र परिस्थिती का सुधारत नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मेहकर तालुक्यातील अनेक गावातील पाणी प्रश्न सुटावा, यासाठी मागील दोन ते तीन वर्षाच्या काळात तालुक्यात कोट्यवधी रुपयांच्या महाजल व जलस्वराज योजना राबविण्यात आल्या. या योजनेंतर्गत एका-एका गावात ५० लाख तर काही गावात त्यापेक्षाही जास्त खर्च करण्यात आला; मात्र शासनाने लाखो रुपये खर्च करूनही ज्या गावात सदर योजना राबविण्यात आली ती गावे अजूनही तहानलेलीच आहेत. महाजल व जलस्वराज योजनेची काही गावांमध्ये निकृष्ठ दर्जाची कामे झालेली असताना कोठेही या प्रकारची हालचाल झाल्याचे दिसून आले नाही. महाजल व जलस्वराज योजना राबवित असताना त्यावेळी ग्राम पातळीवर समित्या नेमण्यात आल्या होत्या. या योजनेची कामे करून बिले काढण्याचा अधिकार हा केवळ समिती अध्यक्ष व सचिवालाच होता; परंतु महाजल व जलस्वराजच्या गावपातळीवरील अनेक समित्या या फक्त नाममात्र कागदोपत्री होत्या. नाव एकाचे, काम करणारा दुसरा तर बिले काढणारा तिसराच, याप्रमाणे ही योजना राबविण्यात आल्याची चर्चा आहे. कागदोपत्री योजना यशस्वी झाली असली, तरी प्रत्यक्षात मात्र योजनेचा बट्ट्याबोळ झाल्याने अनेक गावात पाणी टंचाईचे संकट आज रोजीसुद्धा कायमच आहे.

सध्या तालुक्यात तीव्र पाणीटंचाई आहे; परंतु कोठेही पाणीटंचाई भासू नये, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. महाजल व जलस्वराजची कामे निकृष्ठ झाली असतील, तर तक्रार आल्यास कारवाई करण्यात येईल
- आ.पी.पवार, गटविकास अधिकारी, पं.स.मेहकर.

Web Title: Mahajal, water-based schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.