विधानसभा निवडणुकीत गाजणार स्थानिक मुद्दे
By Admin | Updated: August 30, 2014 00:01 IST2014-08-29T23:38:06+5:302014-08-30T00:01:24+5:30
खामगावातील स्थानिक मुद्दे विधानसभा निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार असल्याचे दिसुन येत आहे.

विधानसभा निवडणुकीत गाजणार स्थानिक मुद्दे
अनिल गवई / खामगाव
शहरात गेल्या काही महिन्यांपासून विधानसभा निवडणुकीचा ज्वर तीव्र होत आहे. अद्याप निवडणुकीची तारीख जाहीर झाली नाही; मात्र शहरात कोण उमेदवार राहील, अमका उमेदवार रिंगणात असल्यास कशी लढत रंगणार, आदी प्रश्नांची चर्चा सध्या गल्लीबोळात रंगू लागली आहे. यामध्ये विविध राजकीय पक्षांसह त्या पक्षांच्या संभाव्य उमेदवारासंदर्भातील कुजबुज आता दैनंदिन विषय झाला आहे. शहरात सुरू असलेल्या विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पणामुळे राष्ट्रीय राजकारणासोबतच वाढती महागाई आणि इतर समस्यांचा मुद्दा आता गौण झाला आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत खामगाव मतदारसंघासह खामगाव शहरात महायुतीच्या उमेदवाराला मिळालेला लीड काँग्रेसच्या उमेदवारासाठी चिंता वाढविणारा असाच आहे.
खामगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार दिलीप सानंदा यांची उमेदवारी निश्चित आहे. त्या दृष्टिकोनातून आ. सानंदा यांनी आपली इमेज बिल्डिंग करण्याचे प्रयत्न ग्रामीण भागासह शहरात चालविले आहेत. शहर विकास आघाडीच्या तावडीत असलेल्या नगरपालिकेवर आघाडीचा झेंडा फडविण्यात ते यशस्वी झाले आहेत. नगराध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत बाजी मारत विधानसभेपूर्वीची सेमिफायनल त्यांनी जिकंली आहे. या शिवाय शहरातील प्रत्येक समाजाला जोडण्याचे त्यांचे मनसुबे असून, शहरातील प्रत्येक वस्तीमध्ये त्यांनी विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यासाठी ते झपाट्याने पुढे सरसावले आहेत. त्याचवेळी शहरातील पॉवरफुल नेते आमदार भाऊसाहेब फुंडकर यांनीही ह्यअबकी बार..आकाश फुंडकरह्ण असा नारा देत, त्यांचे सुपुत्र आकाश फुंडकर यांना रिंगणात उतरविले आहे. भाऊसाहेबांची राजकीय कारकीर्द आणि मोदी लाटेवर स्वार होत आकाश फुंडकर यांनीही दंड थोपटले आहे. भाऊसाहेबांच्या कुटुंबातील उमेदवार म्हणून आकाश फुंडकर यांचे पारडे जड असल्यामुळे त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे.
मोदी लाटेच्या प्रभावामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार खा. प्रतापराव जाधव यांना खामगाव विधानसभा मतदारसंघात २६ हजार मतांची आघाडी मिळाली होती. खामगाव शहरात ही आघाडी ९ हजार मतांच्या घरात आहे. त्यामुळे भाजपचे पारडे कसे जड आहे, या निवडणुकीत एवढा मोठा लीड कापणे काँग्रेसला अशक्य होईल, तर दुसरीकडे आमदार सानंदा यांच्या विकास कामाच्या पुढे भाजप फेल पडेल, असा प्रतिदावाही मतदारसंघात ऐकायला मिळत आहे. खामगाव विधानसभा मतदारसंघात गेल्या पंधरा वर्षांपासून आ. सानंदा विजयी होत आहेत. त्यांनी दिलेली अनेक आश्वासनांची पूर्तता केली आहे. कोट्यवधी रुपयांची विकास कामे त्यांनी केली आहेत; मात्र मतदारसंघात विकासात्मक कामे हवी त्या प्रमाणात झाली नसल्याचाही सूर शहरातील काही प्रभागातील मतदारांमध्ये आहे. विकास कामांपेक्षा आ. सानंदांचा गाजावाजा मोठा असल्याचीही चर्चा शहरात आहे. दुसरीकडे या दोघांच्या भांडणात भारिपचे अशोक सोनोने यांनीसुद्धा मतदारसंघात आपली प्रतिमा उजळविण्याचे काम सुरू केले आहे. जशा निवडणुका जवळ येतील तशी परिस्थिती बदलणार आहे.
कारण आजची स्थिती उद्या तशीच राहात नाही. कदाचित ही परिवर्तनाचीही नांदी असू शकते. त्यादृष्टीने प्रत्येक जण कामाला लागला आहे.