भूमीअभिलेखचा कारभार ‘रामभरोसे’
By Admin | Updated: May 13, 2014 22:56 IST2014-05-13T22:55:28+5:302014-05-13T22:56:12+5:30
तालुका उप-अधिक्षक भूमीअभिलेख कार्यालयाचा कारभार हा रामभरोसे चालत असून कार्यालयात १५ कर्मचारी कार्यरत असताना १२ मे रोजी १३ शिपाई गैरहजर असल्याची बाब त्रस्त शेतकर्यांनी निदर्शनास आणून दिली.

भूमीअभिलेखचा कारभार ‘रामभरोसे’
मोताळा : येथील तालुका उप-अधिक्षक भूमीअभिलेख कार्यालयाचा कारभार हा रामभरोसे चालत आहे. कार्यालयात १५ कर्मचारी कार्यरत असताना १२ मे रोजी १३ शिपाई गैरहजर असल्याची बाब त्रस्त शेतकर्यांनी निदर्शनास आणून शेती मोजणीसाठीच्या कामासाठी शेतकरीवर्गाला कसे वेठीस धरल्या जाते, हे प्रत्यक्ष दाखवून दिले. येथील उपअधीक्षक भूमीअभिलेख कार्यालयाचे प्रमुख एम.डी.भावे असून, प्रभारी मुख्यालय सहायक म्हणून एन.एम.लहाने कारभार पाहातात. यांच्या कार्यक्षेत्रात तालुकाभरातील शेत मोजणीची कामे व तालुक्यातील सात गावांच्या घरांच्या मोजणीचे काम केल्या जाते; मात्र अनेक दिवसांपासून शेतकर्यांना कर्मचार्यांच्या बेजबाबदारपणाचा त्रास सहन करावा लागत आहे. १२ मे रोजी या कार्यालयात अनिल शेवाळे व एस.टी. ठाकरे हे दोन शिपाई वगळता एक ही अधिकारी व कर्मचारी हजर नव्हते. कार्यालय प्रमुख भावे यांचेसुद्धा दरवाजाला कुलूप लावलेले आढळले तर उर्वरित आस्थापना विभाग, संगणक कक्ष, तांत्रिक विभाग, नगर भूमापन विभाग, अभिलेख कक्ष आदी सर्व कुलूप बंद होते तर एका विभागामध्ये सर्व कर्मचारीवर्गाच्या खुच्र्या खाली आढळून आल्या. यावेळी शेतकर्यांनी आपल्या व्यथा मांडत सांगितले की, शेत मोजणीच्या कामासाठी ४ ते ६ हजार रूपये घेऊन फक्त एक हजार रूपयाची पावती दिली जाते. बर्याचवेळा नेट कनेक्शन बंद आहे, याची सबब पुढे करून शेतकर्यांना त्रास वाढवीला जातो. येथील कार्यालय प्रमुख भावेकडे मलकापूरचासुद्धा प्रभार असल्यामुळे त्या सबबीवर ते नेहमीच गैरहजर असल्याच्या तक्रारी शेतकर्यांनी केल्या. त्यांचाही वचक कर्मचार्यांवर नसल्याने शेतकर्यांना फटका बसत आहे. हजर शिपाईवर्गाला कर्मचार्यांबाबत विचारले असता १५ कर्मचार्यांपैकी पाच जागा रिक्त असून, काही कर्मचारी मोजणीसाठी बाहेर जिल्हय़ात गेले आहेत, अशी माहिती मिळाली तर उर्वरित कर्मचार्यांपैकी एकही कर्मचारी आज कार्यालयात हजर आढळला नाही. कर्मचार्यांच्या या वागणुकीमुळे कामासाठी येणार्या शेतकर्यांना दिवसभर उन्हात ताटकळत बसावे लागते. अश्या प्रकारचा भोंगळ कारभार येथील कार्यालयात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असून, येथील कर्मचार्यांवर कोणाचाही वचक नसल्याची शेतकर्यांनी याबाबत तक्रार केली आहे.