दुष्काळग्रस्त शेतक-यांची तारांबळ

By Admin | Updated: January 19, 2015 02:47 IST2015-01-19T01:10:07+5:302015-01-19T02:47:16+5:30

लोणार तालुक्यातील प्रकार; तलाठय़ांकडून दुष्काळग्रस्त शेतक-यांची यादी लावण्यास टाळाटाळ.

Lack of drought-hit farmers | दुष्काळग्रस्त शेतक-यांची तारांबळ

दुष्काळग्रस्त शेतक-यांची तारांबळ

लोणार : अपुर्‍या पावसामुळे लांबलेली पेरणी, यामुळे घटलेले पिकांचे उत्पादन, यानंतर परतीच्या पावसाने दिलेला फटका अशा तिहेरी नैसर्गिक संकटांमुळे दुष्काळात होरपळणार्‍या तालुक्यातील ३६ हजार ३४ अत्यल्प भूधारक आणि ७ हजार ११३ बहुभूधारक शेतकर्‍यांसाठी शासनाकडून ९ कोटी रुपये १0 जानेवारी रोजी प्राप्त झाले आहेत. मदतीस पात्र खातेदारांची बिनचूक यादी तयार करून ती ग्रामपंचायत कार्यालयात प्रकाशित करण्याचे निर्देश तलाठय़ांना असतानासुद्धा अद्याप तालुक्यातील काही गावांच्या याद्याच प्रकाशित करण्यात आल्या नाहीत. तलाठय़ांकडून याद्या लावण्यास टाळाटाळ होत असल्याने शेतकर्‍यांची तारांबळ उडाली आहे.
तालुक्यातील ३६ हजार ३४ अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांना ४ हजार ५00 रुपये प्रतिहेक्टर मदत मिळणार असून, यासाठी दोन हेक्टरपर्यंतची र्मयादा राहणार आहे. ७ हजार ११३ बहुभूधारक शेतकर्‍यांना एक हेक्टर र्मयादेपर्यंत मदत दिली जाणार आहे. सदर मदत थेट शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होणार असल्याने तलाठय़ांना अशा खातेदारांच्या बिनचूक याद्या तयार करून, त्यांचे चावडी वाचन करून त्या ग्रामपंचायतच्या फलकावर दर्शनी भागात लावण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांच्याकडून आल्यानंतरही या याद्या अद्याप ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात आल्या नाही. यामुळे यादीत आपले नाव, खातेक्रमांक बरोबर आहे की नाही, याची खातरजमा स्थानिक तहसील कार्यालयात करण्यासाठी शेतकर्‍यांची ग्रामीण भागातून पळापळ होत आहे.
याद्या लावण्यासाठी पटवार्‍यांकडून टाळाटाळ होत असल्यामुळे मदतीपासून वंचित राहण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. याकडे तहसीलदार यांनी तात्काळ लक्ष देऊन याद्या प्रसिद्ध करण्यासाठी तलाठय़ांना निर्देश देण्यात यावे. अल्प भूधारक, बहुभूधारक दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मदत वाटपात मिळणारी रक्कम खात्यात जमा होणार आहे. सदर रक्कम नापिकीमुळे थकलेल्या कर्जात वळती करण्यात येऊ नये, अशी मागणी प्रा. बळीराम मापारी यांनी केली आहे.
दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना जाहीर झालेल्या मदत निधीपैकी पहिल्या टप्प्यात केवळ ४0 टक्के निधी म्हणजे नऊ कोटी रुपये तालुक्याला प्राप्त झाले आहेत. गावाच्या क्रमवारीनुसार सदर रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात थेट जमा होणार आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ होणार नाही तसेच उर्वरित निधी उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे तहसीलदार नीलेश अपार यांनी सांगीतले.

Web Title: Lack of drought-hit farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.