देऊळगावराजा शहरात स्वच्छतेचा अभाव, नाल्या तुंडूब भरल्या
By Admin | Updated: June 16, 2014 00:52 IST2014-06-15T23:34:02+5:302014-06-16T00:52:29+5:30
ऐन पावसाळा तोंडावर आलेला असतांनाही शहरातील नाल्या, घाण पाणी आणि कचर्याने तुडूंब भरल्या आहेत.

देऊळगावराजा शहरात स्वच्छतेचा अभाव, नाल्या तुंडूब भरल्या
देऊळगावराजा : देऊळगावराजा नगर पालिकेच्या गलथान कारभारात अद्यापही सुधारणा होत नसून ऐन पावसाळा तोंडावर आलेला असतांनाही शहरातील नाल्या, घाण पाणी आणि कचर्याने तुडूंब भरल्या आहेत. नागरिकांचे आरोग्य जपण्याच्या दृष्टीने त्वरीत नाल्या साफ करण्याची मागणी होत आहे.
शहरात नगर पालिकेचे एकूण चार प्रभाग आहेत आणि सतरा नगरसेवक शहराचे प्रतिनिधीत्व करतात. शहरवासियांना उत्तम सोयी सुविधा पुरविण्याची जबाबदारी नगर पालिकेची असतांना त्यादृष्टीने कारभार होत नाही. शहरातील नाल्यांची स्थिती स्वच्छतेच्या दृष्टीने विचार करायला लावणारी आहे. मृग नक्षत्रानंतर कोणत्याही क्षणी पाऊस येवू शकतो. त्यापुर्वी नाल्यांमध्ये साचलेले घाण पाणी आणि कचरा साफ करण्याचे कामाचा नगर पालिकेला विसर पडल्याचे दिसून येते. पावसाचे आगमन झाल्यानंतर याच अस्वच्छतेमुळे रोगराई निर्माण होवून नागरिकांच्या व लहान मुलांच्या आरोग्याला बाधा पोहचू शकते. ही बाब दुर्लक्षित करण्यासारखी नाही. शिवसेनेचे नगरसेवक नंदन खेडेकर यांनी मुख्याधिकारी यांना याबाबतचे निवेदन दिल्यानंतरही नाल्यांची स्वच्छता करण्याची तत्परता न.प.ने दाखविली नाही. नाल्यांमध्ये साचलेले घाणपाणी, हवेमुळे त्यता जावून पडणारा कचरा, महिनोमहिने स्वच्छता होत नसल्याने अक्षरश: या परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मेनरोड वरील काही दुकानात खरेदी करण्यासाठी गेल्यानंतर दुर्गंधीमुळे ग्राहकांचा जीव कासावीस होतो. तर दुकानदारांना या बाबीचा किती त्रास होत असेल. त्याचबरोबर शहरातील अंतर्गत भागातही घराच्या समोर हीच समस्या असल्याने वयोवृध्द नागरिक व बाल गोपाळांना हा त्रास मुकाटपणे सोसावा लागत आहे. शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी सुस्तावलेली नगरपालिका साफसफाईची मोहिम कधी सुरू करणार याकडे शहरवासियांचे लक्ष लागून आहे.