६३ हजार हेक्टरवर होणार खरीप पेरणी
By Admin | Updated: June 20, 2014 00:17 IST2014-06-19T23:30:43+5:302014-06-20T00:17:47+5:30
शेतकरी बांधव सोयाबीन पिकाची मोठय़ा प्रमाणावर पेरणी करणार आहेत.

६३ हजार हेक्टरवर होणार खरीप पेरणी
सिंदखेडराजा : यंदाच्या खरीप पिकाची पेरणी तोंडावर आली असून यंदाही शेतकरी बांधव सोयाबीन पिकाची मोठय़ा प्रमाणावर पेरणी करणार आहेत. त्याखालोखाल शेतकर्यांनी कापूस या पिकाला पसंती दिली आहे. सिंदखेडराजा तालुक्यात खरीप पिकाचे क्षेत्र ६५ हजार ५६0 हेक्टर एवढे असून ६३ हजार ३६८ हेक्टर क्षेत्रावर यंदाच्या खरीप पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. यंदा शेतकरी बांधवांनी तृणधान्य आणि कडधान्याच्या पिकाकडे पाठ फिरवली असून, या पिकाच्या लागवडीचे क्षेत्र मात्र कमालीचे घसरले आहे. त्यामुळे यंदा चाराटंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यंदा तब्बल ३२ हजार ३६२ क्षेत्रावर सोयाबीन तर २१ हजार ४६३ हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड करण्यात येणार आहे. सोयाबीन या पिकाचे सरासरी लागवड क्षेत्र २२ हजार १00 हेक्टर तर कपाशीचे सरासरी लागवड क्षेत्र २0 हजार ५४0 हेक्टर एवढे आहे. शेतकरी बांधवांचा सोयाबीन आणि कपाशी या नगदी पिकांच्या पेरणीकडे ओढा वाढत असतांना दुसरीकडे तृणधान्य पिकांकडे शेतकर्यांनी मात्र पाठ फिरविली आहे. तृणधान्य पिकाच्या लागवडीचे सरासरी क्षेत्र ८ हजार ८१0 हेक्टर एव्हढे असतांना यंदा शेतकरी बांधव अवघ्या १ हजार ३१६ हेक्टर क्षेत्रावरच तृणधान्याची लागवड करणार आहेत. यात ज्वारी ५९९ हेक्टर क्षेत्रावर, मका ५९२ हेक्टर क्षेत्रावर, बाजरी ४0 हेक्टर क्षेत्रावर आणि अन्य तृणधान्ये ८६ हेक्टर क्षेत्रावर याप्रमाणे पेरणी होणार आहे.कडधान्य पिकाच्या लागवडीचे सरासरी क्षेत्र १३७३0 हेक्टर एव्हढे असून यंदा मात्र अवघ्या ७ हजार ५१६ हेक्टर क्षेत्रावर कडधान्याची लागवड होणार आहे. यात तुर ३ हजार ३६१ हेक्टर, उडीद एक हजार ७८१ हेक्टर, मुग २ हजार २८७ हेक्टर तर अन्य कडधान्ये ८५ हेक्टर क्षेत्रावर पेरण्यात येणार आहेत. शेतकरी बांधवांनी पेरणीची तयारी करुन ठेवली असून तो शेतीच्या अंतीम मशागतीला लागला आहे. खत, बियाणे यांची खरेदी करण्याची घाई शेतकरी करत आहेत. यंदा सोयाबीनच्या बियाण्याचे भाव आकाशाला भिडले असल्याने अनेक शेतकरी बांधवांचा घरगुती बियाणे वापरण्याकडे कल वाढला आहे. मृग नक्षत्र सरत असून अद्याप मृगधारा सार्वत्रीक बरसल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी बांधव मोठय़ा पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. यामुळे पेरण्या अद्याप मोठय़ा प्रमाणावर सुरु झाल्या नाहीत.