स्वातंत्र्यपूर्व काळापासून बससुविधेपासून वंचित असलेले गाव ‘खामखेड’
By Admin | Updated: April 26, 2017 14:10 IST2017-04-26T14:10:38+5:302017-04-26T14:10:38+5:30
तालुक्यातील खामखेडया गावात अद्यापपर्यंत राज्य परिवहन महामंडळाची बस पोहचलेली नाही.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून बससुविधेपासून वंचित असलेले गाव ‘खामखेड’
चिखली : भारताला स्वातंत्र्य मिळून ६९ वर्षे उलटूनही तालुक्यातील खामखेड
या गावात अद्यापपर्यंत राज्य परिवहन महामंडळाची बस पोहचलेली नाही.
त्यामुळे या गावात तातडीने नियमित बसफेरी सुरू करण्यात यावी, अशी मागणी
जिल्हा काँग्रेस सेवादलाचे संघटक रविंद्र डाळीमकर यांनी केली आहे.
याबाबत चिखली आगार प्रमुखांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
तालुक्यातील खामखेड हे सुमारे २ हजार लोकवस्तीची गाव असून या गावात
आजपर्यंत केवळ मतदानाच्या पेट्या नेण्याव्यतिरिक्त बस कधी फिरकलेली नाही.
त्यामुळे दळणवळणासाठी मोठी कसरत करावी लागते. तसेच बसफेरी अभावी शाळकरी
मुलांना उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी जाण्यासाठी तसेच रूग्ण व वृध्दांना
अतिरिक्त भूर्दंड सोसावा लागतो. आजरोजी खामखेड व कव्हळा येथील सुमारे १५०
ते २०० विद्यार्थी शिक्षणासाठी नियमितपणे चिखली येथे ये-जा करतात. तसेच
खामखेड गावासाठी ग्रामपंचायत कार्यालय करणखेड येथे असून खामखेड ते करणखेड
अंतर ७ किमीचे असल्याने बससुविधेअभावी खासगी प्रवासी वाहतुकीचा आधार
घ्यावा लागतो व यामुळे आर्थिक भूर्दंड सोसावा लागत असून सद्यस्थितीत
कव्हळा फाटा ते खामखेड रस्त्याचे डांबरीकरणाचे काम पूर्ण झालेले असल्याने
रस्त्याची समस्या राहली नाही. याची दखल घेत ग्रामस्थांच्या सुविधेसाठी
खामखेड, गोंधनखेड, कव्हळा अशी नियमितपणे बसफेरी सुरू करण्यात यावी, अशी
मागणी रविंद्र डाळीमकर यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)