तीन महिन्यांत फक्त ४० दिवस खरेदी
By Admin | Updated: April 24, 2017 02:52 IST2017-04-24T02:52:12+5:302017-04-24T02:52:12+5:30
बारदान्याअभावी ५३ दिवस तूर खरेदी बंद होती, तर प्रत्यक्षात ४० दिवसच शेतकऱ्यांची तूर घेण्यात आली. यामुळे आजही हजारो क्विंटल तूर पडून आहे.

तीन महिन्यांत फक्त ४० दिवस खरेदी
नांदुरा : तुरीची खरेदी हमीभावापेक्षा कमी भावात सुरु झाल्याने हमीभावाने शेतकऱ्यांची सर्व तूर खरेदी करू, अशी घोषणा करणाऱ्या शासनाने नांदुरा तालुक्यासाठी भारतीय खाद्य निगम (एफसीआय) च्या माध्यमातून हमीभावाने तूर खरेदी १९ जानेवारीपासून सुरू करुन २२ एप्रिल रोजी खरेदी बंद केली आहे. मात्र, या तीन महिन्यांच्या काळात बारदान्याअभावी ५३ दिवस तूर खरेदी बंद होती, तर प्रत्यक्षात ४० दिवसच शेतकऱ्यांची तूर घेण्यात आली. यामुळे आजही हजारो क्विंटल तूर शेतकऱ्यांच्या घरात व काही मोजणीअभावी बाजार समितीत पडून आहे. तुरीचे भाव पडल्याने हमीभावासाठी भारतीय खाद्य निगमच्या माध्यमातून नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शासकीय तूर खरेदी केंद्र १९ जानेवारीला सुरू झाले. त्यावेळी तालुक्यात लेट व्हेरायटीचा पेरा जास्त असल्याने तूर विक्रीसाठी आवक कमी होती. मात्र, आवक आल्यानंतर काही दिवसातच बारदाना संपला व तूर खरेदी ठप्प झाली. बारदाना फारसा उपलब्ध होत नसल्याने बारदाना आला, तर दोन ते तीन दिवस तूर खरेदी सुरू असायची व पुन्हा बंद असे चित्र मागील तीन महिन्यांत वारंवार बाजार समितीत पाहायला मिळाले. याबाबत विचारणा केली असता मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार मागील तीन महिन्यांत फक्त ४० दिवस तूर खरेदी सुरू होती व ५३ दिवस बंदच राहली. याबाबत बारदाना उपलब्ध नसणे हे प्रमुख कारण होते. त्यामुळे सतत तीन महिने तुरीची शासकीय खरेदीचा शासनाचा दावा फोल असून, प्रत्यक्षात फक्त ४० दिवस तूर खरेदी सुरु होती. या कालावधीत नांदुरा येथे फक्त २७ हजार क्विंटल तुरीची खरेदी झाली आहे. आजरोजी खरेदी बंद होणार, या भीतीने शेतकऱ्यांनी बाजार समितीत ट्रॅक्टर, ट्रक, बैलगाडे आदी वाहनांमधून तूर विक्रीसाठी आणली आहे व त्यांना मोजणीची प्रतीक्षा आहे. बाजार समिती आवारात शेतमाल ठेवायला जागा नसल्याने व यापूर्वी मोजणीसाठी दोन महिन्यांचा कालावधी लागल्याने आजही अनेक शेतकऱ्यांची तूर घरी पडून आहे व त्यातच शासनाचे तूर खरेदी केंद्र आता बंद झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. त्यामुळे मोजके तीन महिन्यात फक्त ४० दिवस तूर खरेदी सुरु ठेवणाऱ्या शासनाने तूर खरेदीसाठी मुदत वाढवून द्यावी व शेतकऱ्यांच्या तुरीची खरेदी हमीभावाने पुन्हा सुरु करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. बाजारपेठेत व्यापारी तुरीची खरेदी अल्पदराने करीत असल्याने शासकीय हमीभावाची खरेदी सुरु झाली नाही, तर शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.
तूर विकायला दोन महिन्यांची प्रतीक्षा
नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हमीदर केंद्रावर बहुतांश शेतकऱ्यांच्या मालाच्या मोजणीकरिता दोन महिन्यांचा अवधी लागला आहे. बारदाना संपला, त्यानंतर आपलीच मोजणी होणार, या आशेपोटी शेतकरी दररोज बाजार समिती यार्डात मालाच्या संरक्षणासाठी बसून असत. बहुतांश शेतकरी जेवणाचा डबा व पाण्याची बॉटल घेऊन विक्रीसाठी आणलेल्या तुरीच्या गंजीवर रात्रंदिवस असत. हमीभावासाठी शेतकऱ्यांच्या या संघर्षानंतर मोजणी झाली. मात्र, आजही अनेकांच्या घरात तूर पडून असल्याने व खरेदी केंद्रच आता बंद झाल्याने शेतकरी धास्तावले आहेत.