ज्वारीचा पेरा घटला
By Admin | Updated: June 12, 2014 22:43 IST2014-06-12T22:08:05+5:302014-06-12T22:43:58+5:30
दैनंदिन आहारातील महत्वपूर्ण घटक असलेली भाकरी आजच्या बदललेल्या पीक पध्दतीमुळे व वातावरणातील बदलामुळे मिळेनाशी झाली आहे.

ज्वारीचा पेरा घटला
वडगाव वाण : शेतकरी व शेतमजुरांच्या दैनंदिन आहारातील महत्वपूर्ण घटक असलेली भाकरी आजच्या बदललेल्या पीक पध्दतीमुळे व वातावरणातील बदलामुळे मिळेनाशी झाली आहे. गहू, तांदुळ, मुबलक मिळतील. परंतु ज्वारीची मात्र वाणवा असल्यामुळे भाकरी मात्र मिळत नाही, असे चित्र आहे. तर यावर्षीही ज्वारीचा पेरा कमी होणार असल्याचे शेतकर्यांच्या चर्चेतून समजते.
दहा वर्षापूर्वीच्या काळात सणासुदीला व लग्न प्रसंगात मिळणारी गव्हाच्या पोळीचे नावीण्य होते. कारण तेव्हा परिसरात गव्हाचे पीक मोजकेच घेतले जायचे तर ज्वारीचा पेरा प्रत्येक शेतकरी करायचा. ह्या पिकाचा दुहेरी फायदा शेतकर्याला होता घरचा अन्नाचा प्रश्न सुटायचा व कडब्यापासून जनावरांना वैरण उपलब्ध व्हायचे आणि शेतकर्यांकडे कामाला असणार्या मजुरांना सुध्दा ज्वारीच्या रूपात मजुरी दिली जात असल्याने शेतकर्याला रोखीचा व्यवहार सुध्दा कमी करावा लागत होता. परंतु काळ बदलला पिक पध्दती वातावरणातील लहरीपणामुळे बदलावी लागल्याने ज्वारीचे पिक कोणीही पेरत नसल्याने आज पुरणपोळीचे नव्हे तर ज्वारीच्या भाकरीचे नावीण्य आहे. अन्न सुरक्षा कायद्यामुळे २ रूपये किलोप्रमाणे मिळणारा गहू, ३ रूपये किलोप्रमाणे मिळणारा तांदुळ घराघरात उपलब्ध आहे व खुल्या बाजारात सुध्दा गव्हाचा भाव १५ ते १८ रूपये किलोप्रमाणेच आहे. परंतु ज्वारी मात्र आज २0 रूपये ते ३0 रूपये किलोप्रमाणे मिळत असल्याने भाकर खाताना खिशाचाच विचार घ्यावा लागतो. शेतमजूर मात्र पचायला सोपी व आरोग्य वर्धक असणारी ज्वारी बेभाव झाल्याने खावू शकत नाही म्हणून खंत व्यक्त करतात.