सिंदखेडराजा येथे नोकरी महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:56 IST2017-07-31T00:55:11+5:302017-07-31T00:56:04+5:30

सिंदखेडराजा येथे नोकरी महोत्सव
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा: शैक्षणिक वाटचालीनंतर नोकरीच्या अपेक्षेत असणाºया सुशिक्षित तरुणांसाठी मातृतीर्थ ग्रामीण विकास संस्था सिंदखेडराजा माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या नोकरी मेळाव्यास जवळपास १ हजार ५०० पेक्षा जास्त युवक, युवतींनी हजेरी लावली.
जास्तीत जास्त सुशिक्षित तरुणांना नोकरी मिळावी, त्यांच्यापर्यंत योग्य संधीची माहिती पोहोचवली जावी या हेतूने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ११ वाजतापासून या मेळावाला सुरुवात झाली होती. नोकरी महोत्सवाचे उद्घाटन माजी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले. याप्रसंगी आयसीआयसीआय बँक मॅनेजर भूषण मेटकर, नीलेश काळे, पीयूष, आशीष अमकरी, देवेंद्र्र देशमुख, यशस्वी ग्रुप नागपूर आदी उपस्थित होते.
आजच्या युवा पिढीसमोर सर्वात मोठी समस्या आहे ती योग्य नोकरीची. अनेकदा पात्रता आणि गुणवत्ता असूनही तरुणांना योग्य नोकरी मिळत नाही. योग्य पर्याय मिळत नसल्याने मिळेल ती नोकरी करणाºया तरुणांची संख्या मोठी आहे. त्याचप्रमाणे विविध कंपन्यांपर्यंत योग्य उमेदवार पोहोचत नसल्याने तिथेही अपेक्षित नोकरदार मिळत नाहीत. त्यामुळे नोकरीची गरज असलेले आणि नोकरी देणाºयांमध्ये एक योग्य दुवा असणे गरजेचे झाले आहे. त्यासाठीच मातृतीर्थ ग्रामीण विकास संस्था सिंदखेडराजाच्या वतीने हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती अॅड. नाझेर काझी यांनी दिली. या मेळाव्याला दहावी, बारावी उत्तीर्ण तसेच पदवीधर आणि तरुण-तरुणींनी गर्दी केली होती. जवळपास २ हजाराच्यावर बेरोजगारांनी इथे आपल्या नावांची नोंदणी केली. विविध प्रकारची शैक्षणिक पात्रता असलेल्या बेरोजगारांना नोकरीच्या संधी कुठे उपलब्ध आहेत, याची माहिती असलेल्या यशस्वी ग्रुप, नागपूर यानी बेरोजगारांना नोकरीसाठी सविस्तर माहिती दिली. राज्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे यापैकी प्रत्येकाला शासकीय नोकरी मिळेलच, अशी शाश्वती नाही. कारण वाढणारी लोकसंख्या, संगणकीकरण, जागतिकीकरण, यांत्रिकीकरणामुळे शासकीय नोकºयांची संधी अल्प आहे. अशा परिस्थितीमध्ये सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी खासगी क्षेत्रांकडे वळावे, असे आवाहन आयोजनाकडून करण्यात आले होते. मेळाव्यासाठी अगोदर नोंदणी करण्यात आली होती. जवळपास २ हजाराच्यावर युवकांनी नोंदणी केली होती. या नोकरी महोत्सवात विविध पदासाठी परीक्षा व मुलाखती घेऊन पात्र उमेदवाराची निवड करण्यात आली आहे. या नोकरी मेळाव्याला विविध कंपनांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अॅड. संदीप मेहेत्रे, गजानन चेके, नितीन चौधरी, अभिजित राजे, राहुल चव्हाण, गंगाधर ठाकरे यांच्यासह अनेकांनी यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.