अर्धवेळ कर्मचारी भरती प्रक्रियेत अनियमितता
By Admin | Updated: December 20, 2014 00:17 IST2014-12-20T00:17:32+5:302014-12-20T00:17:32+5:30
कामगार कल्याण मंडळ : सेवाशर्तीचे नियम डावलले.

अर्धवेळ कर्मचारी भरती प्रक्रियेत अनियमितता
हर्षनंदन वाघ/बुलडाणा
राज्यातील कामगार कल्याण मंडळाअंतर्गत अर्धवेळ कर्मचार्यांची भरती करताना सेवाशर्तीचे नियम डावलण्यात आले. गेल्या दोन वर्षात भरतीत अनियमिततेमुळे काही मंडळ सदस्यांनी स्वहित साधले. त्यामुळे पूर्णवेळ कर्मचार्यांसह २0-२५ वर्षे अर्धवेळ सेवा झालेले कर्मचारी सेवेपासून वंचित राहिले आहेत.
कामगार कल्याण मंडळाच्या २५ जुलै २0१३ च्या परिपत्रकानुसार कामगार कल्याण मंडळात अर्धवेळ कर्मचारी भरती करताना विभाग प्रमुखांनी आपल्या अधिपत्याखालील केंद्रातील अर्धवेळ कर्मचार्यांच्या रिक्त पदासाठी उमेदवार सेवायोजन कार्यालयाकडून मागविण्यात यावे, असे स्पष्ट नमूद केले आहे. मात्र सन २0१३-१४ व २0१४-१५ या आर्थिक वर्षात राज्यातील कामगार कल्याण मंडळात तब्बल १२५ पेक्षा जास्त अर्धवेळ कर्मचार्यांनी नियमबाह्य भरती करण्यात आली आहे. यात अकोला, औरंगाबाद विभागाला सर्वाधिक अर्धवेळ कर्मचार्यांचा भरणा करण्यात आला आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या अकोला विभागार्तंगत अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. यामध्ये एकूण ३५ केंद्र विभागीय व गट कार्यालयात जवळपास २५ अर्धवेळ कर्मचार्यांची नेमणूक अशासकीय सदस्यांच्या दबावातून केली आहे. त्याचप्रमाणे औरंगाबाद विभागीय कार्यालयात जवळपास ४0 अर्धवेळ कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे खर्या अर्धवेळ कर्मचार्यांवर अन्याय झाला आहे. राज्यात एकूण २३५ कामगार कल्याण केंद्रे असून, ७ विभागामध्ये १९ गट कार्यालये आहेत. राज्यातील कामगार कल्याण मंडळात अडीच हजाराच्यावर कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र शासनसेवा निर्धारित नियमांना डावलून जवळपास दीडशेच्यावर कर्मचार्यांची भरती करण्यात आली आहे.