बोरखेडी शाळेत विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम
By Admin | Updated: April 17, 2017 01:01 IST2017-04-17T01:01:19+5:302017-04-17T01:01:19+5:30
धाड- ‘आपले गाव आपली शाळा’ ह्या संकल्पानुसार धाड (बोरखेड) ता. बुलडाणा या छोट्याशा गावातील ग्रामस्थ व शिक्षक यांनी एकत्रित येऊन शाळेचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे.

बोरखेडी शाळेत विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम
ग्रामस्थ व शिक्षकांकडून प्रयत्न : उन्हाळ्यात सुरू केली शाळा
धाड: सध्या शालेय शिक्षणाचे सत्र संपले असून, विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या आहे. ‘आपले गाव आपली शाळा’ ह्या संकल्पानुसार धाड (बोरखेड) ता. बुलडाणा या छोट्याशा गावातील ग्रामस्थ व शिक्षक यांनी एकत्रित येऊन शाळेचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. उन्हाळा सुरू असतानाही ११ एप्रिलपासून शाळा सुरू करून नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत केल्या गेले.
शिक्षण विभागातील सर्व समस्यावर मात करून बोरखेड शाळेत ग्रामस्थ व शिक्षकांकडून हा उपक्रम राबविला जात असून, वर्ग १ ते ४ पर्यंतचे या शाळेत शिक्षण दिल्या जात आहे. ग्रामस्थांनी व शिक्षकांनी लोकवर्गणीतून शाळेची दुरुस्ती, रंगरंगोटी, खेळ साहित्य, पुस्तके विविध उपक्रम राबवण्यास सुरुवात करीत सध्या वर्ग १ ते ४ पर्यंत नवीन प्रवेश सुरू करून मुलांना दररोज दैनंदिन शिकवणी वर्ग सुरू केले आहे. शहरांमध्ये मुले उन्हाळ्यात विविध उन्हाळी शिबिरे, संगीत स्पर्धा यासारख्या उपक्रमात सहभागी होऊन पालक वर्ग त्यांचे सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करीत असतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अशी कोठलीच सोय उपलब्ध राहत नाही. ग्रामीण मुलांमध्ये शिक्षणाप्रति रुची कमी होते. परिणामी जिल्हा परिषदांच्या प्राथमिक माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्याची संख्या रोडावत आहे.या परिस्थितीत बदल करण्यासाठी शासन विविध उपक्रम राबत आहे. या विविध शैक्षणिक योजनांचा लाभ घेत, ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी बोरखेडी शाळेमध्ये ११ एप्रिल रोजी शाळा सुरू करून नवीन विद्यार्थ्यांचे शाळा प्रवेश सुरू केले. शिवाय त्यांचे स्वागत केल्या गेले. या ठिकाणी मराठी प्राथमिक शाळेवर कार्यरत शिक्षक शिवानंद पडोळ व प्रमोद पवार यांनी हा स्तुत्य उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. याठिकाणी सकाळी शाळा सुरू करून विद्यार्थ्यांना विविध खेळ पुस्तकांचे वाचन गोष्टी तथा कवायती यासह शाळेची गोडी यासाठी शिक्षक प्रयत्न करीत आहे.
११ एप्रिल रोजी बोरखेड धाड येथील मराठी प्राथमिक शाळेवर शाळेचे शिक्षकांसह ज्ञानेश्वर बावस्कर, शालीग्राम खांडवे, सुनील खांडवे, शिवाजी तायडे, शंकर इंगळे, निंबाजी सपकाळ, विष्णू रंजाळ, सारंगधर सुसर या ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून शाळा सत्र सुरू केले.