उद्योगांवरही घोंगावत आहे जलसंकट!
By Admin | Updated: September 4, 2015 23:52 IST2015-09-04T23:52:15+5:302015-09-04T23:52:15+5:30
खामगाव, मलकापुरात उद्योगांना हवे पाणी;खामगाव एमआयडीसीला लागते 0.४३ दलघमी पाणी.

उद्योगांवरही घोंगावत आहे जलसंकट!
मलकापूर (जि. बुलडाणा ) : तालुक्यातील दसरखेड परिसरातील एमआयडीसी परिक्षेत्रात २५0 हेक्टर जमिनीवर उद्योगांचा विस्तार झालेला आहे. जवळपास ४0 विविध उद्योगांची येथे उभारणी झालेली असून, यापैकी आजरोजी २५ उद्योग सुरू आहेत, तर १५ उद्योग बंद झालेले आहेत. वीज वितरण कंपनीचे वाढते दर, आर्थिक मंदी यांसह विविध कारणास्तव येथील बहुतांश उद्योग बंद पडत आहेत. उद्योगाकरिता मुबलक जागा, दळण-वळणाच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग व लोहमार्गाची सोय, पूर्णा नदीच्या बॅकवॉटरचे मुबलक पाणी अशा सुविधा या एमआयडीसीला मिळत आहेत. उद्योगांकरीता पाणी हा महत्त्वाचा घटक असून, येथे पाण्याची समस्या अद्याप नाही. हतनूर धरणाचं बॅक वॉटर वाघोळा पम्पिंग स्टेशनवरून दसरखेड एमआयडीसी कार्यालय परिसरातील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणण्याची व्यवस्था येथे आहे. महिन्याला १५ ते २0 हजार क्यूबिक लिटर पाणी येथे लागते. त्यापैकी १५ टक्के पाणी पिण्याला, तर उर्वरीत उद्योगांकरिता वापरले जाते. पाण्याची स्वतंत्र व्यवस्था येथे असून, या पाण्यावरच येथे सर्वांत मोठा असलेला बिर्ला कॉटसीनसह चार पेपर मिल, तीन केमिकल इंडस्ट्रीज पूर्णत: अवलंबून आहेत. इतर उद्योगांपेक्षा अधिक प्रमाणात याच उद्योगांना अधिक पाणी लागते. त्यामुळे शासनाचा निर्णय या उद्योगांना मारक ठरू शकतो.१८५ भूखंडांचे वाटप झालेले असून, मोजक्याच भूखंडांवर उद्योग उभारणी झालेली आहे. यातील काही उद्योग तर बंद आहेत.
कमी पावसाचा फटका
यावर्षी पावसाळा सरासरीपेक्षा बराच कमी झाल्याने भविष्यात पाणीटंचाईचे संकट लक्षात घेता, शासनाने उद्योगांना पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील सर्वांत मोठय़ा अशा खामगाव व मलकापूर येथील औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योगांच्या पाणीपुरवठय़ाबाबत आढावा घेतला, तर या दोन्ही एमआयडीसींना सध्या मुबलक पाणी असले तरी भविष्यात पाण्याचे संकट भेडसावू शकते, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
खामगाव एमआयडीसीला लागते 0.४३ दलघमी पाणी
खामगाव एमआयडीसीमध्ये ४७१ उद्योगांची नोंद असून, सद्यस्थितीत सुमारे २२५ उद्योग सुरू आहेत. एमआयडीसीच्या उद्योगासाठी गेरू माटरगाव येथील ज्ञानगंगा प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येतो. 0.४३ दशलक्ष घनमीटर पाणीपुरवठा उद्योगांसाठी आरक्षित केलेला आहे.