इंदिरा, रमाई आवास योजनेचे तीनतेरा!

By Admin | Updated: April 17, 2017 00:48 IST2017-04-17T00:48:02+5:302017-04-17T00:48:02+5:30

संग्रामपूर तालुक्यातील चित्र : १३४ घरकुले अपूर्ण, तर तीन घरकुले रद्द

Indira, Ramai Awas Yojana, three! | इंदिरा, रमाई आवास योजनेचे तीनतेरा!

इंदिरा, रमाई आवास योजनेचे तीनतेरा!

अमोल ठाकरे - संग्रामपूर
संग्रामपूर पंचायत समितीतर्फे इंदिरा आवास व रमाई आवास योजनेंतर्गत तीन वर्षांत तालुक्यासाठी १ हजार ४६ घरकुले देण्यात आली होती. त्यापैकी १३४ अपूर्ण आहेत, तर तीन घरकुले रद्द करण्यात आली आहेत. इंदिरा आवास व रमाई आवास योजनेच्या कक्षातील कर्मचाऱ्यांनी लक्ष न दिल्यामुळे व या विभागात अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त असल्यामुळे इंदिरा व रमाई आवास योजनेचे तीनतेरा वाजले आहेत.
शासनाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या नागरिकांना इंदिरा आवास योजनेखाली घरकुल देण्याचे नियोजित आहे. यासाठी रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्याला १ लाख २० हजार रुपयांपर्यंत तरतूद आहे. तर इंदिरा आवास योजनेच्या लाभार्थीला ९५ हजारपर्यंत तरतूद आहे. सन २०१६-१७ मध्ये इंदिरा आवास योजनेचे रुपांतर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये करण्यात आलेले आहे.सन २०१४-१५ मध्ये पंचायत समितीला इंदिरा आवास योजनेचे ३६० घरकुलांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ३५० घरकुले पूर्णत्वास गेली असून, १० घरकुले ही अपूर्ण आहेत. तर २०१५-१६ मध्ये इंदिरा आवास योजनेच्या घरकुलाचे ५३९ घरकुलांचे उद्दिष्टे होते. त्यापैकी ४२१ घरकुले ही सद्यस्थितीत पूर्णत्वास गेली असून, उर्वरित १०८ घरकुल लाभार्थींना प्रथम (अग्रिम) हप्ता देण्यात आला आहे, तर ३१ घरकुले ही सद्यस्थितीत अपूर्ण असून, ८४ घरकुलांचेही बांधकाम सुरू आहे. यातील पातुर्डा, वरवट खंडेराव, दुर्गादैत्य या गावातील प्रत्येकी १ घरकुल रद्द करण्यात आले आहे. सन २०१६-१७ मध्ये पंचायत समितीला रमाई आवास योजनेचा १४७ घरकुलांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी १०० घरकुले लाभार्थींना प्रत्येकी ३५ हजार रुपये प्रथम हप्ता देण्यात आला आहे. तर ४७ लाभार्थींचे बँक खाते क्रमांक आॅनलाइन न झाल्यामुळे व आॅनलाइन तपासणी सुरु असल्यामुळे या लाभार्थींच्या घरकुलाचा प्रथम हप्ता अद्यापपर्यंत मिळाला नसल्यामुळे या लाभार्थींनी बांधकामाला सुरुवात केलेली नाही. त्यामुळे ४७ घरकुल लाभार्थींना बांधकामासाठी प्रथम हप्ता केव्हा मिळणार, यासाठी संबंधित लाभार्थी दररोज पंचायत समितीमध्ये चकरा मारत आहेत.
गत तीन वर्षात रमाई आवास योजनेत ४७ घरकुल अपूर्ण आहेत. तर इंदिरा आवास योजनेचे सन २०१४-१५ मध्ये १० घरकुले अपूर्ण आहेत. सन २०१५-१६ मध्ये ७७ तर तीन घरकुले ही रद्द करण्यात आलेली आहेत. अपूर्ण राहिलेल्या घरकुलांकडे संबंधित स्थापत्य अभियंता, शाखा अभियंता व पं.स.च्या कनिष्ठ अभियत्यांचे दुर्लक्ष झाल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात ही घरकुले अपूर्ण राहिलेली आहेत. या बाबीकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.

पंचायत समितीमधील अभियंत्यांची पदे रिक्त
पंचायत समितीमध्ये स्थापत्य अभियंत्याची चार पदे मंजूर आहेत. पैकी १ स्थापत्य अभियंता कार्यरत आहे, तर शाखा अभियंत्याची दोन पदे मंजूर असून, एक शाखा अभियंता कार्यरत आहे. कनिष्ठ अभियंताची दोन पदे मंजूर असून, सद्यस्थितीत एक कनिष्ठ अभियंता कार्यरत आहे. ही सर्व महत्त्वाची पदे रिक्त असल्यामुळे स्थापत्य अभियांत्रिकी साहाय्यकाचेही चार पदे मंजूर असून, कार्यरत फक्त एकच आहे. त्यामुळे या सर्व कामाचा व्याप एकाच स्थापत्य अभियांत्रिकी सहायकावर पडत आहे.

Web Title: Indira, Ramai Awas Yojana, three!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.