विदर्भात भूजल पातळीत वाढ
By Admin | Updated: May 20, 2014 00:40 IST2014-05-20T00:06:27+5:302014-05-20T00:40:26+5:30
गत वर्षी बरसलेला पाऊस त्याचबरोबर अवकाळी पावसानेही विदर्भातील भूजल पातळीत वाढ केली.

विदर्भात भूजल पातळीत वाढ
नीलेश शहाकार/बुलडाणा
हिवाळा संपता-संपता विदर्भाला गारपीट व अवकाळी पावसाने झोडपले आणि सर्वत्र गारांचा खच पडला, पिके पाण्यात गेली; मात्र या गारपीट व अवकाळी पावसाने भूजल पातळीत वाढ झाली आहे. विदर्भातील सर्वच भागातील भूजल पातळीत सरासरी एक ते दीड मीटरची वाढ झाली आहे. उन्हाळ्यात विहिरी कोरड्या पडत असल्याने पाणीटंचाई जाणवते. दुष्काळामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो; पण गत वर्षी बरसलेला पाऊस वैदर्भीयांसाठी महत्त्वाचा ठरला आहे. त्याचबरोबर अवकाळी पावसानेही भूजल पातळीत वाढ केली. भूजल पातळीचे निरीक्षण करण्यासाठी सप्टेंबर २0१३ आणि २0१४ च्या जानेवारी, मार्च व एप्रिल महिन्यामध्ये भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेद्वारे भूजल पातळीच्या नोंदी घेण्यात आल्या. गत पाच वर्षाच्या भूजल पातळीशी तुलनाही करण्यात आली. त्यानुसार यावेळी सरासरी एक ते दीड मीटरने भूजल पातळी वाढल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यंदा काही भागातील अपवाद वगळता विदर्भात पाणीटंचाईचे संकट जाणवले नाही.