...तर विदर्भ राज्य करण्याशिवाय पर्याय नाही - श्रीहरी अणे
By Admin | Updated: April 17, 2017 00:43 IST2017-04-17T00:43:40+5:302017-04-17T00:43:40+5:30
शेगाव- महाराष्ट्राला जगायचे असेल, तर विदर्भ राज्य करण्याशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन विदर्भवादी नेते तथा माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी रविवारी केले.

...तर विदर्भ राज्य करण्याशिवाय पर्याय नाही - श्रीहरी अणे
शेगाव : मोठ्या राज्यात आर्थिक भेदभाव वाढीस लागते. विकासात असमतोल निर्माण होतो. प्रशासन नीट काम करू शकत नाही आणि सरकार राज्य कारभार करण्यात अपयशी ठरते. यातून पुढे प्रादेशिक असंतुलन होत असल्याचे स्पष्ट करून महाराष्ट्राला जगायचे असेल, तर विदर्भ राज्य करण्याशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन विदर्भवादी नेते तथा माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी रविवारी केले.
येथे आयोजित एक दिवसीय विदर्भ जागृती अभ्यास शिबिरात प्रमुख वक्ते म्हणून आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. एखाद्या कुटुंबाला चालवण्यासाठी लागणारा खर्च आणि संपूर्ण मोहल्ल्याचे भरणपोषण करण्यासाठी लागणारा खर्च जसा एक समान होऊ शकत नाही. त्याप्रमाणे आकाराने आणि लोकसंख्येने मोठे असलेल्या राज्यांना सांभाळणे कोणत्याच पातळीवर शक्य होत नाही. त्यामुळे प्रादेशिक असंतुलन निर्माण होते. जगणे कठीण होऊन बसते. महाराष्ट्रात अशीच स्थिती निर्माण झाली असल्याचा दावा त्यांनी केला. विदर्भ राज्याच्या आर्थिकदृष्ट्या व्यवहार्यतेबद्दल ते म्हणाले, व्हायबिलिटी म्हणजे खिशात पैसा खुळखुळणे नव्हे, तर लोक आर्थिकदृष्ट्या तग धरू शकतील काय, असा त्याचा अर्थ आहे. इतर राज्यातील जिल्ह्यांची शहरे आणि विदर्भातील जिल्ह्याचे शहर याची तुलना केल्यास आपल्याला भकासपणा जाणवेल. कर्जमा फीबाबत बोलताना ते म्हणाले, की शेतकऱ्यांचे कर्ज माफ करताना ते पुढे शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणार नाही, यासाठी त्यांच्या शेतमालास योग्यभाव आणि ठिकठिकाणी अनुदान शासनाने द्यायला हवे तरच हा प्रश्न मार्गी लागू शकतो.
या पत्रकार परिषदेला विदर्भ राज्य आघाडीचे मुख्य संघटक श्रीकांत तराळ, बुलढाणा जिल्हा संघटक मनीष किरडे, अकोल्याचे संघटक चंद्रकांत बोदडे, अमोल कठाने, अजय गवई, प्रशांत वाघमारे आदींची उपस्थिती होती.
महाराष्ट्रदिनी विदर्भाच्या अकराही जिल्ह्यात फडकणार काळे झेंडे!
ाहाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून विदर्भवादी संघटनांनी वेगळ्या विदर्भाचा पुन्हा एकदा संकल्प सोडला. या निमित्त विदर्भ राज्य आघाडीच्यावतीने विदर्भाच्या सर्व अकराही जिल्ह्यात विदर्भाचे झेंडे फडकवण्यात येतील, अशी घोषणा माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी केली असून, सर्व कार्यकर्त्यांना त्याबाबत सूचना देण्यात आल्याची माहिती अणे यांनी दिली. विदर्भ वेगळा व्हावा, यासाठी घेतलेल्या जनमत चाचणीत संपूर्ण या मागणीच्या बाजूने भरभरून मते पडली. तरीही राज्यकर्ते येथील जनतेवर अन्यायच करीत आहेत. म्हणूनच "महाराष्ट्र दिन" काळा दिवस पाळून आम्ही शासनाचा निषेध करीत आहोत, असे अणे यांनी सांगितले.
विदर्भापेक्षा मराठवाड्याची स्थिती अत्यंत खराब
कारण विदर्भापेक्षाही मराठवाड्याची स्थिती अत्यंत वाईट आहे. विदर्भाला माझ्यासारखे बोलणारे पाच लोक तरी आहेत, पण मराठवाड्याच्या बाजूने बोलणारे कोणीच नाही. गोपीनाथ मुंडे आणि विलासराव यांच्या नंतर मराठवाडा हा नेतृत्वहीन झालेला आहे. त्याचा प्रत्यय येत्या उन्हाळ्यात पाण्याने भरलेल्या ट्रेन्स आल्यानंतर सर्वांनाच दिसणार आहे. त्यामुळे मराठवाडाही स्वतंत्र होणे तेथील नागरिकांसाठी अत्यंत जरुरीचे आहे, असे अॅड. श्रीहरी अणे म्हणाले.