शेकडो मुलांनी दिले माफीनामे!

By Admin | Updated: September 24, 2016 02:30 IST2016-09-24T02:30:45+5:302016-09-24T02:30:45+5:30

गत दोन वर्षात छेडखानी प्रकरणात जिल्ह्यात शेकडो मुलांनाही माफीनामे लिहून दिले आहे.

Hundreds of children apologize! | शेकडो मुलांनी दिले माफीनामे!

शेकडो मुलांनी दिले माफीनामे!

नीलेश शहाकार
बुलडाणा, दि. २३ - छेडखानी प्रकरणात मुलींना कायद्याचे संरक्षण आहे, शिवाय प्रकरण गंभीर नसताना केलेल्या कृत्याचा पश्‍चात्ताप व्यक्त करण्यासाठी कारवाई पथकामार्फत दोषी मुलांकडून बर्‍यावेळा माफीनामे घेतले जातात. गत दोन वर्षात जिल्ह्यात शेकडो मुलांनाही माफीनामे लिहून दिले असून, यापुढे असे कृत्य हातून घडल्यास कायदेशीर कारवाईस पुढे जाण्याची तयारी दर्शविली आहे.
शहरातील सार्वजनिक ठिकाण, शाळा, महाविद्यालय, रेल्वेस्टेशन व बसस्थानक आदी ठिकाणी बर्‍याच वेळा मुलींना छेडखानीसारख्या घटनांना तोंड द्यावे लागते. अशा छेडखानी करणार्‍यांवर वचक बसविण्यासाठी तसेच मुलींच्या सुरक्षेसाठी पोलिसांचे दक्षता व दामिनी पथक कार्यरत आहे. त्यामुळे पथकांकडून रोजच लहान-मोठय़ा कारवाया केल्या जातात.
मुलींची छेडखानी करताना आढळलेल्या मुलांवर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे; मात्र प्रकरण फारसे गंभीर नसेल, शिवाय कार्यवाहीने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असेल, अशावेळी माफीनामे लिहून घेत, त्यांच्यावरील कारवाई तूर्तास टळली जाते. यानंतर मात्र सदर युवक पुन्हा छेडखानी करताना आढळला तर गुन्हे दाखल करण्यात येतात.

१५९ मुलांना झाला पश्‍चात्ताप
कारवाई दरम्यान मुलामुलींच्या नावामध्ये कमालीची गुप्तता बाळगली जाते. शिवाय मुलींच्या सुरक्षेसोबतच मुलाच्या सामाजिक व शैक्षणिक आयुष्याकडेही सकारात्मक दृष्टीने पाहिले जाते. यातून संधी देत दोन वर्षात १५९ मुलांनी केलेल्या कृत्याचा पश्‍चात्ताप व्यक्त करीत आपले माफीनामे पोलीस व दक्षता पथकाकडे दिले. असे कृत्य भविष्यात घडल्यास कायदेशीर कारवाईस पुढे जाण्याची तयारी दर्शविली आहे.

गंभीर प्रकरण पोलिसांकडे
मुलींना घरुन पळवून नेणे, मारहाण, लैंगिक व शारीरिक अत्याचार, अश्लील व्हिडिओ, मॅसेज आदी गंभीर प्रकरण पथकाच्या कारवाईत आढळून आल्यास, यात माफीनाम्याची तरतूद नाही, मग अशी प्रकरणे वरिष्ठास सोपवून त्यात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येते. दोन वर्षात तब्बल दोनशेच्यावर असे गुन्हे दाखल झाले आहेत.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत ही कारवाई केली जाते. चुका सौम्य असल्यास आयुष्यात सुधारण्याची पुन्हा एक संधी देण्यासाठी माफीनामा लिहून घेतला जातो. पुन्हा चूक झाल्यास तो कायदेशीर कारवाईस पात्र ठरतो.
- प्रभाकर वाघमारे, पोलीस दक्षता पथक प्रमुख

Web Title: Hundreds of children apologize!