सातपुड्यातील आदिवासींची घरे भर उन्हातही थंडगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2017 20:16 IST2017-04-25T20:16:37+5:302017-04-25T20:16:37+5:30
जळगाव जामोद- मानवाने विकसीत केलेल्या भौतिक सुविधांनाही लाजवतील अशा सुविधा आदीवासी निर्माण करतात तेव्हा आपसुकच आपल्याला आदिवासींचे महत्व कळते.

सातपुड्यातील आदिवासींची घरे भर उन्हातही थंडगार
जयदेव वानखडे - जळगाव जामोद
जगात तंत्रज्ञान खुप पुढे गेले विज्ञान एवढी प्रगती केली की नवनवीन शोधांमुळे भौतिक सुविधांचा मानवी जीवनात सुकाळ आला. घरोघरी सोयी सुविधांनी जागा व्यापली. मात्र यातुन सुटला तो आदिवासी वर्ग सातपुड्याच्या जंगलात राहून आपले संघर्षमय जीवन जगतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पोटाची खळगी भरण्यासाठी राबतो. अशा जीवनात सुविधांचा विचार कोण करणार? दोन वेळचे जेवण मिळाले तरी खुप काही कमविल्याचा आनंद त्यांचा चेहरा सांगुन जातो आणि नैसर्गिक साधनांचा वापर करून मानवाने विकसीत केलेल्या भौतिक सुविधांनाही लाजवतील अशा सुविधा हे आदीवासी निर्माण करतात तेव्हा आपसुकच आपल्याला आदिवासींचे महत्व कळते.
जळगाव जामोद तालुक्याच्या उत्तरेला सातपुडा पर्वत रांगांमध्ये जवळपास १७ आदिवासी गावे वसली आहेत. डोंगराळ भागात आजही एसटी जात नाही. तेथे रस्ते नाहीत, वीज नाही याची तमा न बाळगता हे आदिवासी आपल्या परंपरा जपत जगतात त्यांची घरे अतिशय जुन्या आणि सुविधा नसलेली आहेत. परंतु नैसर्गिक संकटांचा सामना करण्यासाठी हे लोक नेहमी तत्पर असतात. भर उन्हाळ्याचे दिवसात उन्हापासून आपल्या मुलांबाळांचा बचाव करण्यासाठी त्यांनी शक्कल लढवून तयार केलेले घर म्हणजे भौतिक सुविधा असलेल्या घरांनाही लाजवेल इतके वातानुकुलीत असते. त्यांच्या घरावर मातीची छपरे आपल्याला आढळून येतात. या मातीच्या छपरामुळे कुळांना माती आणि शेणाच्या लेप देवून स्वच्छ सारवण केल्या जाते चारही बाजुंनी शेणामातीचे कुळ वरून मातीचे छप्पर असलेल्या या घरांना लाकडी बांबुच्या फळ्यांपासून बनविलेला दरवाजा लावण्यात येतो. त्यामुळे घरात येणारी हवा थंड वाहते आणि घरामध्ये ना पंखा ना कुलर तरीही घरे या आदिवासींना एसीचा आनंद घेतात.
अशी बनवितात आदिवासी घरावरील छप्परे
डोंगरकपारीत गवती छप्पर तर कुठ टिनपत्र्यांची आदिवासींची घरे मात्र उन्हाळ्याची दाहकता त्यांना सोसवत नाही अशावेळी घरावरील छतावर ताडपत्री अंथरली जाते. या ताडपत्रीवर सुकलेल्या गवताचा पातळ थर दिला जातो. आणि त्यावर डोंगराळ मुरुमाची मऊ माती अंथरतात ही झाली छताची मरम्मत तर आजुबाजुला शेणाने लिपलेले कुळ आणि व्हेंटीलेटर म्हणून दरवाजाला बांबुच्या कामठांचे झडप. यामुळे घरात कसे थंडगार वाटते. नैसर्गिकरित्या वातानुकुलीत झालेले हे घर खरोखरच आरोग्यदायी वाटते. नैसर्गिकरित्या वातानुकुलीत झालेले हे घर खरोखरच आरोग्यदायी वाटते आणि आदिवासींचे उन्हापासून संरक्षणही करते. अशाप्रकारे वातानुकुलीत घराचा प्रयोग गेल्या १० वर्षापासून वडपाणी, सोनबर्डी, नांगरटी, कहूपट्टा, भिंगारा, गोमाल, निमखेडी, हनवतखेड, रायपुर, चाळीसटापरी इत्यादी परिसरातील आदिवासी गावांमध्ये केला जातो.
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या डोंगरात वनराई कमी झाल्याने उष्णतामान चांगलेच जाणवते. अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी आदिवासींनी वातानुकुलीत घरांची लढवलेली शक्कल खरोखर उल्लेखनीय आणि कौतुक करण्यासारखी आहे. भौतिक सुविधांमुळे तुम्हाला आजार जडतात मात्र ही घरे खरोखर आरोग्यदायी असुन नैसर्गिक उपचार केंद्राचे काम करणारी आहेत आणि पावसाळ्यात या उताराच्या छपरावरून पाणी घसरून जाते आणि हळुहळू ह्याच छपरांवर हिरवेगार गवतही उगवते त्यामुळे श्रावणात अतिशय सुंदर हिरवीगार घरे पाहायला मिळतात. मात्र त्यातून पाणी गळत नाही, हे विशेष !
घराच्यासह इतर बाबतीतही या लोकांचे वेगळेपण पाहायला मिळते. उंचावर मचाण बांधुन त्यावर पिण्याच्या पाण्याची भांडी ठेवली जातात. त्यामुळे खेळती हवा आणि मातीची भांडी यामध्ये थंडगार पाणी मिळते. आणि पाणी उंचावर ठेवल्याने रात्री बेरात्री वन्यप्राणी सुध्दा फिरकत नाहीत असे निकोप जीवन येथील आदिवासी कुठली सुविधा नसतानाही जगतात.