हमीदर केंद्रावर दोन लाख क्ंिवटल तूर पडून!
By Admin | Updated: April 25, 2017 00:39 IST2017-04-25T00:39:18+5:302017-04-25T00:39:18+5:30
सोमवारीही वजनकाटे राहिले बंद : मुदतीत आलेल्या तुरीच्या मोजमापाची प्रतीक्षा

हमीदर केंद्रावर दोन लाख क्ंिवटल तूर पडून!
गिरीश राऊत - खामगाव
कधी नव्हे ती विक्रमी तूर खरेदी करणाऱ्या जिल्ह्यातील हमीदराने तूर खरेदी केंद्र आवकसाठी बंदच झाली आहे, तर दिलेल्या मुदतीत या केंद्रावर आलेली १ लाख ९० हजार ४५६ क्ंिवटल तूर पडून आहे. रविवारी मोजमापाला सुटी राहत असल्याने सोमवारी मोजमाप सुरू होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती; मात्र आदेश नसल्याचे कारणावरून मोजमाप दुसरे दिवशीसुद्धा बंदच राहिले. एकूणच अनेक दिवसांपासून या केंद्रावर तूर विक्रीस आणलेल्या शेतकऱ्यांमध्ये आपली तूर खरेदी केली जाईल किंवा नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
गतवर्षी ११ हजार रुपयांपर्यंत भाव पोहोचलेल्या तुरीचे उत्पादन घेऊन उत्पन्न मिळविण्याचे आशेने यावर्षी शेतकऱ्यांनी तुरीचा पेरा केला होता. सुदैवाने तूर पिकाला निसर्गाची सुद्धा साथ मिळाल्याने यावर्षी जिल्ह्यात तुरीचे विक्रमी उत्पादन झाले. मात्र नेहमी हाता-तोंडाशी आलेला घास हिरावल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांची यावर्षीही तुरीचे उत्पादन बऱ्यापैकी झाले असताना भाव पडल्याने कोंडी झाली.
सुरुवातीपासून तर आतापर्यंतही तुरीचे भाव शासनाच्या तुरीला असणाऱ्या हमीदराच्या आसपासही नसल्याने कधी नव्हे, अशी साडेचार लाख क्ंिवटल तूर खरेदी यावर्षी केवळ बुलडाणा जिल्ह्यातील केंद्रांवर करण्यात आली. महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन (नाफेड), विदर्भ मार्केटिंग को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन (व्हीसीएमएम), भारतीय खाद्य निगम (एफसीआय) मार्फत करण्यात आली. मात्र, कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणात खरेदी न केल्याने वा पूर्वनियोजन न झाल्याने तूर खरेदी सुरु झाल्यापासून जिल्ह्यातील अनेक केंद्र बारदान्याचा अभावामुळे बंद होती. मोठ्या प्रमाणात तुरीचे मोजमाप राहिल्याने १५ एप्रिल त्यानंतर २२ एप्रिल, अशी दोनवेळा मुदतवाढ सुध्दा देण्यात आली.
मात्र २२ एप्रिल रोजी आवक बंद केल्यानंतरही २२ एप्रिलआधी या केंद्रावर आलेल्या तुरीचे मोजमाप या तारखेपर्यंत होऊ शकले नाही. त्यामुळे आजरोजी जिल्ह्यातील नाफेडच्या ७ केंद्रांवर १ लाख १२ हजार ६५० क्ंिवटल तूर मोजमापाअभावी पडून आहे. २२ एप्रिलपर्यंत मोजमाप झाल्यानंतर २३ एप्रिल रोजी रविवार असल्याने तुरीचे मोजमाप बंद होते. मात्र, आज सोमवारी सुद्धा तुरीचे मोजमाप करण्यात आले नाही. त्यामुळे केंद्र सुरु असताना विक्रीसाठी आणलेल्या तुरीचे मोजमाप न झाल्याने आपल्या तुरीचे मोजमाप होईल की नाही, असा संभ्रम शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. एकूणच मुदतीत या केंद्रांवर आणलेली तूर खरेदी करण्यात यावी, अशी मागणी त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांचा झाला खर्च
या केंद्रावर तूर विक्रीस आणताना शेतकऱ्यांना वाहतूक खर्च करावा लागला. अनेक शेतकऱ्यांनी मालाची नासाडी होईल म्हणून ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये तुरीचे पोते ठेवलेले आहेत. अशा शेतकऱ्यांना ट्रॉली भाड्याचा खर्च करावा लागत आहे. तसेच बरेच शेतकऱ्यांनी तूर विक्रीस आणल्यानंतर त्यांना ८ ते १० दिवसांपासून केंद्रावर मुक्काम ठोकावा लागला. यामुळे घरी ये-जा करणे व रात्रीची राखणदारी याचाही खर्च करावा लागला आहे. मात्र खर्च झाल्यानंतर तुरीची हमीदराने खरेदी न झाल्यास शेतकऱ्यांची अवस्था ‘सौ के साठ’ अशीच होणार आहे.
--