‘रबलिंग स्ट्रीप’विना महामार्ग ठरतोय जीवघेणा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:37 IST2021-08-26T04:37:02+5:302021-08-26T04:37:02+5:30
चिखली : शहरातून जाणाऱ्या खामगाव-जालना या सिमेंट काँक्रीटच्या नव्या-कोऱ्या चौपदरी महामार्गावरून वाहनांची प्रचंड वर्दळ सुरू आहे. अनेक वाहने सुसाट ...

‘रबलिंग स्ट्रीप’विना महामार्ग ठरतोय जीवघेणा !
चिखली : शहरातून जाणाऱ्या खामगाव-जालना या सिमेंट काँक्रीटच्या नव्या-कोऱ्या चौपदरी महामार्गावरून वाहनांची प्रचंड वर्दळ सुरू आहे. अनेक वाहने सुसाट धावत आहेत. मात्र, सुसाटपणे धावणाऱ्या या वाहनांची मानवी वस्तीतून जात असताना गती नियंत्रणात राहण्यासाठी कुठेही ठोस उपाययोजना नसल्याने अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
चिखली शहरातून जाणारा हा महामार्ग बायपास असला तरी तो मानवी वस्तीतूनच आहे. प्रामुख्याने खामगाव चौफुली, श्री शिवाजी उद्यानाजवळील चौफुली आणि जाफ्राबाद टी पॉईट याठिकाणी वाहनांची प्रचंड वर्दळ असते. शिवाय या भागात हॉस्पिटल, भाजी मार्केट, बँक आदींमुळे नेहमीच नागरिकांची देखील मोठी वर्दळ असते. परंतु, या महत्वाच्या ठिकाणीसुध्दा वारंवार मागणी होऊनही अद्याप ‘रबलींग स्ट्रीप’ बसविण्यात आलेले नाहीत. यातूनच मोठे आपघात होऊन जीवित हानी देखील झालेली आहे. तसेच मेहकर फाटा, शेलूद, पेठ, अमडापूर, उंद्री आदी गावांच्या मध्यभागातून हा रस्ता जातो. मात्र, या महामार्गावर वाहनांचा वेग कमी होण्यासाठी ठिकठिकाणी गतीनियंत्रक नसल्याने लहान-मोठे अपघात वाढले आहेत. तथापी पदाचारी नागरिकांना रस्ता ओलांडणे जीवघेणे ठरत आहे. दरम्यान राहेरीच्या पुलावरून जड वाहतूक बंद झाल्याने जालनाहून सिंदेखडराजा मार्गे नागपूरकडे जाणारी जड वाहनांने आता चिखली मार्गे धावत असल्याने या मार्गावर जड वाहनांची संख्या देखील लक्षणीय वाढली आहे. यामुळे मानवी वस्तीतील रस्त्यावरील रहदारीच्या ठिकाणी व चौकाचौकात ‘रबलिंग स्ट्रीप’ बसविण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.
अपघातानंतरच येते जाग !
या महामार्गावरील पेठ येथे रस्ता ओलांडणाऱ्या एका खासगी बसने भल्या पहाटे उडविल्याने एका तरुणाचा करुण अंत झाला आहे. या अपघातानंतरच संबंधित विभागाला जाग आली व पेठे येथे रबलिंग स्ट्रीप बसविण्यात आले. अशाच एका घटनेत भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाच्या धडकेत जाफ्राबाद टी पॉईटवर एक तरुणाचा बळी गेला आहे. अशा अनेक घटना घडलेल्या असताना आणि ‘रबलिंग स्ट्रीप’ बसविण्याची मागणी होत असतानाही, या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे.
जयभद्रा ग्रुपव्दारे तहसीलदारांना निवेदन !
शहरातून जाणाऱ्या या महागार्मावर ‘रबलिंग स्ट्रीप’ बसविण्याची मागणी याआधी देखील विविध पक्ष-संघटनांनी केली आहे. दरम्यान २४ ऑगस्ट रोजी याच मागणीच्या अनुषंगाने येथील जयभद्रा ग्रुपने तहसीलदांना निवेदन दिले आहे. यावेळी ग्रुपचे संस्थापक पवन घारपडे, शैलेश दुतोंडे, अभिजित खरात, शुभम खरपास, मबश्शीर म.असद, किशाेर रताळे आदी उपस्थित होते.