नापासांमधील नैराश्य दूर होण्यास मदत- शंकर महाराज

By Admin | Updated: June 10, 2015 02:34 IST2015-06-10T02:34:30+5:302015-06-10T02:34:30+5:30

वाया जाणारे वर्ष वाचविण्याचा शासनाचा प्रयत्न निश्‍चितच स्वागतार्ह.

Help overcome hopelessness of Napa: Shankar Maharaj | नापासांमधील नैराश्य दूर होण्यास मदत- शंकर महाराज

नापासांमधील नैराश्य दूर होण्यास मदत- शंकर महाराज

खामगाव: इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी लागलीच फेरपरीक्षा घेऊन त्यांचे वाया जाणारे वर्ष वाचविण्याचा शासनाचा प्रयत्न निश्‍चितच स्वागतार्ह आहे; मात्र आजच्या स्पर्धेच्या युगात गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य येते. या निर्णयामुळे नैराश्य दूर होण्यास मदत होईल, असे रोकठोक मत जागृतीपीठाचे मठाधिपती तथा नापासांच्या शाळेचे संस्थापक प.पू. शंकर महाराज यांनी व्यक्त केले.
'लोकमत'च्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाने येत्या शैक्षणिक वर्षापासून दहावी आणि बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी मुंबईत जाहीर केली. या पार्श्‍वभूमीवर नापासांच्या शाळेचे प्रणेते शंकर महाराज यांची भेट घेतली असता त्यांनी मनमोकळा संवाद साधला.

प्रश्न: नापासांची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे, याबाबत आपले मत काय?
- नापासांच्या फेरपरीक्षेबाबतच्या निर्णयाबाबत आजच आपणाला लोकमतमधून माहिती मिळाली आहे. राज्य शासनाचा हा निर्णय निश्‍चितच स्वागतार्ह आहे.

प्रश्न: शासनाच्या या निर्णयामुळे काय लाभ होईल?
- परीक्षेत नापास झाल्यानंतर अनेकांचा त्या विद्यार्थ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्यामुळे या निर्णयामुळे नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही. त्याच्यासाठी भविष्याचे मार्ग खुले होतील.

प्रश्न: नापास झालेल्यांची लगेचच परीक्षा घ्यावी का?
- परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यामुळे लगेचच परीक्षा देण्याची त्याची मानसिकता राहत नाही. त्यामुळे लगेचच परीक्षा न घेता, एखाद्या महिन्याचा कालावधी द्यायला हवा.

प्रश्न: विद्यार्थ्यांचे वर्ष वाचविण्यासाठी आणखी काय करता येईल?
- विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नैराश्य यायला नको यासाठी, शैक्षणिक संस्था, पालक आणि शासनाने सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे असून, व्यवसायाभिमुख शिक्षण पद्धतीसाठी मार्गदर्शन वर्ग सुरू करायला हवेत. सकारात्मक मार्गदर्शन ही आजच्या काळाची गरज झाली आहे; मात्र आजच्या स्पर्धेत गुणवंत विद्यार्थीही नैराश्येच्या गर्तेत सापडत असल्याने रचनात्मक आणि प्रयोगशील शिक्षण पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

प्रश्न: शिक्षण पद्धतीत बदल करण्याची गरज आहे का?
- निश्‍चितच, आजच्या शिक्षण पद्धतीमुळे स्पर्धा वाढीला लागली आहे. एकाच दिशेने विद्यार्थ्यांचा प्रवास सुरू होतो. नापास नव्हे तर गुणवंताही नैराशांनी गाठल्याचे दिसून येते. त्यामुळे मूल्यांधिष्टित शिक्षण पद्धतीची गरज असून, सेवाभाव हाच शिक्षणाचा पाया असला पाहिजे, असेही ते शेवटी म्हणाले.

प्रश्न: शिक्षण पद्धतीत संशोधनाची गरज आहे का?
- निश्‍चितच, आजच्या शिक्षण पद्धतीत संशोधनाची गरज असून, शैक्षणिक तज्ज्ञासोबतच शैक्षणिक संस्था आणि पालकांनी वैचारिक मंथन करणे अपेक्षित आहे. रवींद्रनाथ टागोर, ईश्‍वरचंद्र विद्यासागर, स्वामी विवेकानंद यांनी रचनात्मक आणि प्रयोगशीलतेवर भर दिला होता. महापुरुषांचादेखील कृतिशीलतेवर भर असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

Web Title: Help overcome hopelessness of Napa: Shankar Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.