ग्रंथोत्सव लोकोत्सव झाला पाहिजे - सपकाळ

By Admin | Updated: February 17, 2016 02:16 IST2016-02-17T02:16:36+5:302016-02-17T02:16:36+5:30

बुलडाणा ग्रंथोत्सवाचे थाटात उद्घाटन; विविध प्रकाशन संस्थांचे स्टॉल.

Granthotsav should be a festival of folklore - SPAKAL | ग्रंथोत्सव लोकोत्सव झाला पाहिजे - सपकाळ

ग्रंथोत्सव लोकोत्सव झाला पाहिजे - सपकाळ

बुलडाणा : ग्रंथ हे नागरिकांच्या मनावर अधिराज्य गाजवितात. ग्रंथामुळेच समाज घडतो. ग्रंथाच्या सहवासाने संस्कारांची उधळण होत संस्कार रूजतात. वाचन संस्कृती वृद्धींगत करण्यासाठी ग्रंथोत्सवांचे आयोजन व्हायला पाहिजे. मनातील गढूळ विचार बाहेर काढण्यासाठी ग्रंथ वाचन महत्त्वाचे आहे. त्यामुळे अशा ग्रंथोत्सवात लोकसहभाग वाढला पाहिजे, किंबुहना ग्रंथोत्सव हे लोकोत्सव झाले तरच वाचन संस्कृती वाढेल व त्या माध्यमातून वैचारिक प्रबोधनाची व पुरोगामी विचारांची पेरणी होईल, असे प्रतिपदान आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. स्थानिक गर्दे सभागृहात बुलडाणा ग्रंथोत्सव २0१६ चा शुभारंभ आज थाटात पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे हे होते तर ज्येष्ठ साहित्यिक सदानंद देशमुख, उपजिल्हाधिकारी रमेश घेवंदे, माजी ग्रंथालय संचालक गणेश तायडे, ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रा. कि. वा वाघ, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सतीश जाधव, महिती अधिकारी नीलेश तायडे आदी उपस्थित होते. आ.सपकाळ यांनी विविध उदाहरणांचे दाखले देत वाचन संस्कृतीची रूजूवात किती महत्त्वाची आहे, हे स्पष्ट करून ग्रंथपालांनी हे काम सामाजिक भावनेतून करावे, असे आवाहन केले. अपर जिल्हाधिकारी टाकसाळे यांनी विचार मानवाला मोठे करतात. त्याकरिता सदृढ मन असणे आवश्यक आहे. कारण सदृढ मनामधूनच प्रगल्भ विचार बाहेर पडतात. अशा सुदृढ मनाला ग्रंथ हे रामबाण औषधासारखे काम करतात. त्यामुळे विद्यार्थी दशेतील प्रत्येकाने ग्रंथांना आपले मित्र करावे. खरा मनुष्य हा मानवतेमधूनच समाजाला दिसतो. मानवता टिकविण्यासाठीही ग्रंथ महत्त्वाची भूमिका बजावित असतात, तरी अशा ग्रंथोत्सवांमधून वाचन संस्कृती प्रबळ होऊन समाजाचे मानसिक स्वास्थ्य टिकून राहील, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली, तर सदानंद देशमुख यांनी सध्याचा काळ धकाधकीचा आहे. ग्रंथ वाचण्याची इच्छा असली, तरी ग्रंथ वाचायला वेळ मिळत नाही; मात्र ग्रंथोत्सवांच्या माध्यमातून निश्‍चितच विविध साहित्य समाजासमोर येते व वाचनाची आवड निर्माण होते. एवढेच नव्हे, तर साहित्य निर्मितीची प्रेरणाही मिळते, असे प्रतिपादन केले. प्रास्ताविकातून जिल्हा ग्रंथालय अधिकारी सतीश जाधव यांनी ग्रंथोत्सव आयोजनामागील भूमिका विषद केली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व ग्रंथपूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन निशिकांत ढवळे यांनी केले, तसेच आभार नीलेश तायडे यांनी मानले. प्रारंभी दिवंगत साहित्यिक सदानंद सिनगारे व सियाचीनमधील शहिदांना ङ्म्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Web Title: Granthotsav should be a festival of folklore - SPAKAL