चार विहिरी तरीही गाव तहानलेले!
By Admin | Updated: April 24, 2017 00:17 IST2017-04-24T00:17:39+5:302017-04-24T00:17:39+5:30
महिलांची पाण्यासाठी वणवण : महाजल योजनेचे फिल्टर प्लॅन्ट बंदच!

चार विहिरी तरीही गाव तहानलेले!
लक्ष्मीकांत जाधव - किनगावराजा
पिण्याच्या पाण्यासाठी २ कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करून उभारण्यात आलेल्या महाजल योजनेचे पाणी गावात येण्याआधीच ही योजना भ्रष्टाचाराने बरबरटल्याने बंद पडली. सध्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत १५ हातपंप आणि चार विहिरी असूनही लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी मैलोगणिक भटकंती करावी लागत असल्याने नागरिकामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
किनगावराजा गावाची लोकसंख्या ७ ते ८ हजार असून, येथील महिलांना आजही भर उन्हामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
येथील ग्रामपंचायत १३ सदस्यांची असून, या ग्रामपंचायतच्या हद्दीत एकूण १५ हातपंप आहेत. यापैकी चार हातपंप नादुरुस्त आहेत. येथील महाजल योजना ही जवळपास २ कोटीहून अधिक रुपये खर्च करून अद्यापसुद्धा बंद असल्यासारखीच आहे. सदर महाजन योजनेची पाइपलाइन ५ ते ६ किलोमीटरवरून आणलेली आहे. याकरिता राहेरी येथील पूर्णा नदीत दोन विहिरी असून, या विहिरीमधून किनगावराजा येथील पाताळगंगा नदीत पूरक विहीर खोदली असून, या विहिरीत पूर्णा नदीतून आणलेले पाणी सोडले आहे; परंतु या विहिरीवरील पाच हॉर्सपॉवरचा सब मर्सिबल पंप बऱ्याच दिवसांपासून बंदच आहे. महाजल योजनेचे फिल्टर प्लॅन्ट बंदच आहे. तसेच विहिरीवरील कडे अपूर्ण आहे. राहेरी येथून महाजलच्या टाकीपर्यंत आलेली पाइपलाइन सुरू केली असता ती हप्त्यातून ४ ते ५ दिवस लिकेज होत आहे. या पाइपलाइनचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे. गावामध्ये जवळपास ३०० ते ४०० नळ कनेक्शन वैध असून, १५० चे वर नळ कनेक्शन अवैध आहेत. तरी भर उन्हात महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. हा त्रास थांबविण्यासाठी संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी गावकऱ्यांकडून मागणी होत आहे.